ऑनलाईन टीम/तरुण भारत
केंद्र सरकारने लागू केलेले तीन कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. या सरकारने घोषणेनंतर देशभरातील विरोधीपक्षांकडून, शेतकरी संघटनांकडून आणि आंदोलनाचं समर्थन करणाऱ्या नागरिकांकडून दिल्लीतील शेतकऱ्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत. त्याचवेळी शेतकऱ्यांसमोर सरकारला झुकावं लागलं असंही बोललं जातंय. काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करत, शेतकऱ्यांचा विजय झाल्याचं सांगितलं. त्यानंतर आज प्रियंका गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींच्या लखनऊ दौऱ्यावरून प्रश्न उपस्थित करत त्यांना पत्र लिहलं आहे.
प्रियंका गांधी यांनी आज लखीमपूर प्रकरणातील आरोपीच्या वडीलांना व्यासपीठावर जागा देऊ नका असं आवाहन करणारं पत्र लिहीलं आहे. प्रियांका गांधी यांनी लखनऊमध्ये पंतप्रधानांचं स्वागत आहे, असं म्हणत त्यांनी DGP कॉन्फरन्समध्ये जाणाऱ्या पंतप्रधान मोदींनी लखीमपूर घटनेतील प्रमुख आरोपी आशिष मिश्राचे वडील असलेल्या केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांच्यासोबत व्यासपीठावर जाऊ नये असं आवाहन केलं आहे. आपण जर त्यांच्यासोबत व्यासपीठावर जात असाल तर ही शेतकरी आंदोलनातील मृत शेतकऱ्यांचा अपमान होईल असंही त्या पुढे म्हणाल्या आहेत.