प्रगत देशांच्या नेत्यांशी वैश्विक मुद्दय़ांवर चर्चा, अंतिम प्रस्तावातही महत्वाची भूमिका
वृत्तसंस्था /बाली
सध्याचे युग युद्धाचे नसून शांततेचे आहे. त्यामुळे युद्धमान देशांनी संघर्षाचा मार्ग सोडून चर्चा आणि सामोपचाराच्या मार्गाकडे परत वळावे. जगाची अर्थव्यवस्था मोठय़ा प्रमाणावर परस्परावलंबी झाल्याने युद्धाला कोठेही स्थान नाही, असे कळकळीचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बाली येथे पार पडलेल्या जी-20 शिखर परिषदेमध्ये केले आहे. रशिया-आणि युपेन यांच्यातील युद्धासंदर्भात हे विधान असल्याने त्याचे जगातील प्रगत देशांच्या नेत्यांकडून स्वागत झाले आहे.
पंतप्रधान मोदी यांनी शांततेचा संदेश रशियाचे अध्यक्ष ब्लादिमिर पुतिन यांना उद्देशून दिला होता. या संदेशाचा समावेश जी-20 परिषदेच्या अंतिम प्रस्तावात करावयाचा की नाही, यावर बुधवारी परिषदेच्या अखेरच्या दिवशी बराच खल झाला. रशियाच्या प्रतिनिधींनी समावेश करण्यास तयारी दर्शविली नव्हती. तथापि, पंतप्रधान मोदींच्या प्रयत्नांमुळे अखेर रशिया या समावेशाला तयार झाला, अशी माहिती मिळाली आहे. चार तासांच्या प्रदीर्घ चर्चेनंतर आणि विलंबानंतर अखेर भारतानेच तोडगा काढून प्रस्ताव मार्गी लावला, असेही स्पष्ट होत आहे. यामुळे जी-20 परिषदेचे अध्यक्षस्थान भारताकडे हस्तांतरित होत असतानाच भारताचे महत्त्वही जागतिक राजकारणात वाढण्याचे सुचिन्ह दिसू लागले आहे.
विविध देशांचे अधिकारी जी-20 च्या अंतिम प्रस्तावाच्या भाषेवर वाद घालत असतानाच भारतीय शिष्टमंडळाने त्यांच्यात समझोता घडवून आणण्यासाठी पडद्याआडून प्रयत्न चालविले होते. ब्राझिल, अर्जेंटिना, मेक्सिको, सौदी अरेबिया आणि सिंगापूर या देशांच्या प्रतिनिधींना प्रस्तावाची भाषा मान्य करावयास राजी करण्यात भारताची भूमिका महत्त्वाची ठरली, असे मत परिषदेत दिसून आले.
अमिताभ कांत यांची भूमिका
भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व शेर्पा अमिताभ कांत यांनी केले. रशियाने युपेनवर केलेल्या हल्ल्यासंदर्भात स्पष्ट संदेश देण्याचे महत्त्वाचे आव्हान परिषदेसमोर होते. संयुक्त राष्ट्र संघाने नुकतेच रशियावर टीका करणारे निवेदन मान्य केलेले आहे. याच निवेदनाच्या भाषेच्या धर्तीवरच जी-20 चा प्रस्ताव असावा, अशी भारताची ठाम भूमिका होती. ती साकारण्यात भारत यशस्वी ठरला, अशी एकंदर भावना आहे. त्यामुळे अमेरिका, ब्रिटन, जर्मनी आदी देशही भारताच्या कामगिरीवर समाधानी असल्याचे दिसून येते, असे आंतरराष्ट्रीय तज्ञांचे मत आहे.