वाराणसीत कार्यक्रम, दिला आत्मनिर्भरतेचा नारा
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
यंदाच्या दिवाळीत सर्व लोकांनी स्थानिक व स्वदेश निर्मित उत्पादनांचीच खरेदी करावी, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. ते आपला लोकसभा मतदारसंघ वाराणसीत 614 कोटी रूपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन करताना बोलत होते. त्यांनी सोमवारी हे उद्घाटन व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून केले.
त्यांनी उद्घाटन केलेल्या प्रकल्पांमध्ये विस्तारित लालबहादूर शास्त्री रूग्णालय, सांडपाणी निचरा प्रकल्प, पायाभूत सुविधा प्रकल्प, गायींचे संवर्धन व संरक्षण होण्यासाठी गोशाळा, संपूर्णानंद स्टेडियमनजीक क्रिडापटूंसाठी गृहनिर्माण प्रकल्प, बहुउद्देशीय बियाणे साठवणूक प्रकल्प आणि सारनाथ ध्वनिप्रकाश प्रकल्प अशा अनेक आस्थापनांचा समावेश आहे. या सर्व प्रकल्पांचे राष्ट्रार्पण करण्यात आले.
स्थानिक आणि स्वदेशी वस्तू खरेदी केल्याने आपण आत्मनिर्भर होऊ शकतो. यामुळे देशाचे आर्थिक सामर्थ्य वाढणार आहे. देशभर स्थानिक उत्पादनांना मागणी वाढली आहे, ही बाब त्यांनी नमूद केली. स्थानिक वस्तूंच्या खरेदीत वाराणसीने आघाडी घ्यावी आणि देशासमोर नवा आदर्श निर्माण करावा, असे आवाहन त्यांनी केले. देशनिर्मित वस्तूंची खरेदी आपण अभिमानाने केली पाहिजे. तसेच त्यांचा प्रचारही केला पाहिजे. त्यामुळे आत्मनिर्भरतेचा संदेश सर्वदूर पसरून अर्थव्यवस्थेला मोठाच हातभार लागणार आहे. स्थानिक वस्तू विकत घेणे याचा अर्थ केवळ पणती विकत घेणे असा नसून दिवाळीला खरेदी केली जाणारी प्रत्येक वस्तू ही स्थानिक किंवा स्वदेश निर्मित असावी, असे वक्तव्य त्यांनी केले.
कृषी धोरणाचे समर्थन
केंद्र सरकारने नुकतेच आपले कृषीधोरण घोषित केले आहे. या धोरणाला विरोधी पक्षांनी आक्षेप घेतला असला तरी ते शेतकऱयांच्या लाभाचे आहे. या धोरणामुळे कृषी मालाच्या खरेदी-व्यवहारांमधील दलालांचा एकाधिकार संपणार आहे. परिणामी, ग्राहकांना कमी दरात कृषीउत्पादने मिळणार असून शेतकऱयांचाही अधिक लाभ होणार आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.
स्वामित्व धोरणामुळे लाभ
केंद्र सरकारने शेतकऱयांना शेतजमीनीची मालकी मिळवून देण्यासाठी ‘स्वामित्व’ योजना आणली आहे. या योजनेंतर्गत शेतकऱयांना त्यांच्या भूमीची स्वामित्वपत्रे दिली जात आहेत. त्यामुळे कर्ज मिळणे सुलभ होणार असून शेतकऱयांच्या जमीनी हडप करण्याचे प्रकारही नाहीसे होणार आहेत, अशी भलावण त्यांनी केली.