नवी दिल्ली / वृत्तसंस्था
गुजरातमध्ये केवडिया येथे स्थापन करण्यात आलेल्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या अतिभव्य पुतळय़ापर्यंत जाण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या विविध भागांमधून 8 रेल्वेगाडय़ांचा प्रारंभ केला आहे. रविवारी त्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून या रेल्वेगाडय़ांना हिरवा बावटा दाखविला.
एकाच वेळी आठ नव्या रेल्वेगाडय़ा सुरू करण्याचा हा देशाच्या इतिहासातील प्रथमच प्रसंग आहे. पंतप्रधान मोदी यांनी या कार्यक्रमात भाषणही केले. आता सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळय़ापर्यंत रेल्वेने जाण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. या संपर्कामुळे केवडिया परिसरातील वनवासी समाजाला नवे रोजगार उपलब्ध होतील, केवडिया परिसरात आता पर्यटकांची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढणार असून त्यात रेल्वे संपर्काची भूमिका मोठी असेल. पर्यटकांची संख्या वाढली की या पर्यटकांना सुविधा व सेवा पुरविणाऱया उद्योगांची संख्याही वाढेल. याचा लाभ या परिसरातील स्थानिक वनवासींना होऊन त्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यास साहाय्य होईल. पर्यटनाच्या माध्यमातून रोजगारनिर्मितीचे ध्येय साध्य होईल. हा आर्थिक उन्नतीचा एक मार्ग आहे असे प्रतिपादन त्यांनी केले.
आठ रेल्वे गाडय़ांची जोडणी
केवडिया ते वाराणसी, दादर ते केवडिया, अहमदाबाद ते केवडिया, दिल्ली ते केवडिया, केवडिया ते रेवा, केवडिया ते चेन्नई, केवडिया ते प्रतापनगर आणि केवडिया ते प्रतापनगर (आणखी एक गाडी) अशा देशाच्या विविध भागांमधील आठ रेल्वेगाडय़ांचे रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केले.