ऑनलाईन टीम
७५व्या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना काल, रविवारी संबोधित केलं. यावेळी मोदींनी देशवासीयांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देत अनेक योजनांची घोषणा केली. तसेच देशातील स्वातंत्र्य सैनिकांच्या कार्याची आठवण देखील करुन दिली. मात्र स्वातंत्र्य सैनिकांची आठवण करुन देताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वातंत्र्य सेनानी मातंगिनी हाजरा यांचा उल्लेख चुकीचा केला. यावरुन तृणमूल काँग्रेसने (टीएमसी) पंतप्रधान मोदींवर जोरदार टीका केली.
पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणादरम्यान स्वातंत्र्य सेनानी मातंगिनी हाजरा या आसामच्या असल्याचा उल्लेख केला होता. मोदींच्या भाषणानंतर तृणमूल काँग्रेसने मोदींना इतिहासाचे फारसे ज्ञान नाही आणि त्यांनी बंगालचे स्वातंत्र्य सेनानी मातंगिनी हाजराचे आसामचे रहिवासी म्हणून वर्णन केल्याबद्दल माफी मागितली पाहिजे असे म्हटले आहे.
पंतप्रधानांच्या भाषणाची एक क्लिप आपल्या ट्विटमध्ये पोस्ट करत तृणमूल काँग्रेसचे सरचिटणीस कुणाल घोष म्हणाले की, पंतप्रधानांना इतिहासाचे फारसे ज्ञान नाही आणि केवळ नाट्यमय पद्धतीने लिखित भाषण वाचले. कुणाल घोष यांनी ट्विट करत, भाजपा, मातंगिनी हाजरा आसामच्या होत्या का? तुम्हाला इतिहासाचे ज्ञान नाही. तुमच्यात भावना नाही. तुम्ही फक्त एक लिहिलेले भाषण (तेही इतरांनी लिहिलेले) नाट्यमय पद्धतीने वाचले,” असे म्हटले आहे.
त्याचवेळी तृणमूल स्वातंत्र्यदिनी पंतप्रधानांच्या भाषणादरम्यान झालेल्या चुकीबद्दल अनावश्यक वाद निर्माण करत असल्याचे भाजपाने म्हटले आहे.
हाजरा यांनी ब्रिटिशांना पूर्ण धैर्याने दिले होते तोंड
वयाच्या ७२ व्या वर्षीही मातंगिनी हाजरा यांनी ब्रिटिशांना पूर्ण धैर्याने आणि उत्कटतेने तोंड दिले होते. वयाच्या १८ व्या वर्षी विधवा झालेल्या हजारा यांनी असहकार चळवळ आणि भारत छोडो आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला. या दरम्यान त्यांना तुरुंगातही जावे लागले होते.