नवी दिल्ली \ ऑनलाईन टीम
देशातील कोरोना परिस्थितीचा खोलवर आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी महाराष्ट्रासह दहा राज्यातील 54 जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधला. यामध्ये महाराष्ट्रातील 17 जिल्ह्यांचा समावेश आहे. तसेच, नाशिक, वर्धा, सांगली, कोल्हापूर, बीड, जालना, उस्मानाबाद आदी जिल्ह्यांमधील कोरोना परिस्थितीचा देखील पंतप्रधान मोदींनी आढावा घेतला.
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, एका लसीचा अपव्यय म्हणजे एका आयुष्याला आवश्यक ते सुरक्षा कवच प्रदान करण्यात अपयश, असं म्हणत त्यांनी लसीचा अपव्यय टाळण्याचा सल्ला अधिकाऱ्यांना दिला. कोरोना संक्रमण हे गेल्या १०० वर्षांतील सर्वात मोठं संकट आहे. कोरोना संक्रमणानं तुमच्यासमोरच्या आव्हानांत वाढ केली आहे. याअगोदरचे साथीचे आजार असोत किंवा कोरोना संक्रमण, महामारीनं आपल्याला एक गोष्ट नक्कीच शिकवली आहे. ती म्हणजे, अशा परिस्थिती संकटाशी दोन हात करण्याच्या प्रयत्नांत सातत्यानं आवश्यक बदल आणि प्रयोग करणं अत्यंत आवश्यक आहे. हा विषाणू आपली रुपं बदलण्यात चलाख आहे. त्यामुळे आपल्या पद्धती आणि रणनीती विस्तृत असायला हव्यात’ असं पंतप्रधान नरेंद्र मोदी अधिकाऱ्यांसोबतच्या बैटकीत म्हटलंय.
तपासणी, सुरक्षित अंतर आदींबाबत लोकांमध्ये गांभीर्य कमी होऊ नये, यासाठी सरकारी तंत्र, सामाजिक संघटना, लोकप्रतिनिधी या सगळ्यांमध्ये एका सामूहिक जबाबदारीचा भाव आपल्याला पक्का करायला हवा. यामुळे प्रशासनाची जबाबदारी अधिक वाढते. कोविड प्रतिबंधात्मक वर्तवणुक जसं मास्कचा वापर, हात धुणे आदींमध्ये जेव्हा काही उणीव राहत नाही व सर्व कोरोना निर्देशांचे नागरिकांकडून पालन केले जाते ते कोरोना विरोधातील लढाईसाठी अत्यंत महत्वाचे ठरते. परिस्थितीवर सतत लक्ष ठेवल्याने, जिल्ह्यातील सर्व प्रमुख विभागांमध्ये योग्य समन्वय राहतो व प्रभावी परिणाम स्वाभाविकपणे दिसू लागतात. असं देखील यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं.
महाराष्ट्र, छत्तीसगड, हरयाणा, केरळ, ओडिशा, पुदुच्चेरी, राजस्थान, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आणि आंध्रप्रदेश या राज्यांतील जिल्हाधिकारी आणि फिल्ड अधिकारी पंतप्रधानांसोबतच्या या बैठकीत सहभागी झाले.