नवे कृषी कायदे मागे घेण्याचा केला आग्रह
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पंजाबचे नवे मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. केंद्राने नवे कृषी कायदे त्वरित मागे घ्यावेत, अशी मागणी आपण पंतप्रधान मोदींकडे केली, असे त्यांनी नंतर वृत्तप्रतिनिधींना स्पष्ट केले.
कायदे मागे घेण्याबरोबरच पंजाबमध्ये केंद्र सरकार त्वरित भाताची खरेदी सुरू करावी, अशीही मागणी त्यांनी केल्याचे समजते. भाताची खरेदी 10 ऑक्टोबरपर्यंत लांबणीवर टाकण्यात आली आहे. आंदोलक शेतकऱयांशी केंद्र सरकारने त्वरित वाटाघाटी सुरू कराव्यात, असे प्रतिपादन त्यांनी केल्याचे समजते.
सिद्धूंचा मुद्दा टाळला
पंजाब काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिलेले नवज्योतसिंग सिद्दू यांच्या बरोबरचे मतभेद संपले आहेत काय? असा प्रश्न पत्रकारांनी त्यांना केला असता त्यांनी उत्तर देण्याचे टाळले. आपण पंतप्रधान मोदींशी बोलण्यासाठी येथे आलो असून याविषयावरील प्रश्नांना उत्तरे देऊ असेही त्यांनी पत्रकारांना ऐकविले.