केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे ठाम प्रतिपादन
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकशाहीविरोधी आहेत, हा विरोधी पक्षांचा आरोप धादांत खोटा असून ते अस्सल लोकशाहीवादी आहेत. दुसऱयाचे म्हणणे ते अभ्यासू वृत्तीने आणि शांतचित्ताने ऐकून घेतात, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले आहे. संसद टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे म्हणणे मांडले.
पंतप्रधान मोदी हे हुकुमशाही मनोवृत्तीचे नेते नाहीत. त्यांच्या इतका शांतचित्ताने ऐकून घेणारा नेता मी आजपर्यंत दुसरा कोणताही पाहिलेला नाही. कोणीही कोणतीही महत्वाची सूचना केली आणि ती जर उपयुक्त असेल तर ते आवर्जून त्या सूचनेवर विचार करतात आणि शक्य तितकी ती कृतीतही आणतात. सर्वसामान्य नागरीक किंवा कार्यकर्ते यांच्या सूचनांचाही ते मान ठेवतात. राष्ट्रीय हितासाठी ते धोका पत्करायलाही मागेपुढे पहात नाहीत. राजकीय नफ्यातोटय़ाचा विचार न करता ते देशहिताला पूरक ठरतील असे कटु आणि धाडसी निर्णय घेतात. असे आजवर कोणत्याही नेत्याने केलेले नाही, असे प्रतिपादन त्यांनी केले.
जवळून निरीक्षण
मी पंतप्रधान मोदींचे निरीक्षण अगदी जवळून केलेले आहे. त्यांची कार्यपद्धती पाहिलेली आहे. मुद्दा कोणताही असो, ते प्रत्येक संबंधिताचे ऐकून घेतल्याखेरीज कोणतीही प्रतिक्रिया देत नाहीत, तसेच वारेमाप बोलतही नाहीत. मंत्रिमंडळाच्या बैठकीत याचा अनुभव येतो. टीकाकारांच्याही शब्दाला मान देण्याची त्यांची कार्यपद्धती आहे. अर्थिक सुधारणा, काळय़ा पैशाविरुद्धचा संघर्ष आणि करचुकवेगिरीविरोधातील धोरण त्यांनी कठोरपणे अवलंबिले आहे. यामुळे भाजपचे समर्थक किंवा भाजपला सातत्याने मतदान करणाऱयांचीही अडचण झालेली आहे. तथापि, तो धोका ते पत्करतात, अशी भूमिका शहा यांनी मांडली आहे.