याश वादळाने झालेल्या हानीचा आढावा घेणार
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
‘याश’ चक्रीवादळाने ग्रस्त पश्चिम बंगाल आणि ओडीशा या राज्यांचा दौरा पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून केला जाणार आहे. आज शुक्रवारी ते या राज्यांना भेट देतील. प्रथम ते ओडिशाची राजधानी भुवनेश्वर येथे येतील आणि नंतर हेलिकॉप्टरने वादळग्रस्त भागांची पाहणी करतील, असे सांगण्यात आले.
गुरूवारी पंतप्रधान मोदींनी वादळाचा आढावा घेण्यासाठी दिल्लीत उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन केले होते. आपत्तीनिवारण कार्याचाही त्यानी या बैठकीत आढावा घेतला. वादळग्रस्त भागात राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या 46 तुकडय़ा नियुक्त केलेल्या होत्या. या तुकडय़ांनी 1 हजाराहून अधिक लोकांचे प्राण वाचविले. यांनी 2,500 हून अधिक झाडे व खांबांना दूर करत बचावकार्य केले. वादळाच्या मार्गाची माहिती आधीच मिळाल्याने लोकांना वेळेवर सुरक्षित स्थळी घेऊन जाणे शक्य झाले आणि त्यामुळे जीवीत हानी मोठय़ा प्रमाणात टाळली गेली. या दलांनी वादळग्रस्त भागांमध्ये सर्वेक्षण घेऊन हानीची पाहणी केली. त्यानुसार अधिक हानी झालेल्या भागांमध्ये अधिक साहाय्य वितरीत करण्यात आले. अनेक प्रभावित भागांमधील दळणवळण व्यवस्था पूर्ववत करण्यात आली आहे. अनेक खेडय़ांमध्ये वीज पुरवठाही सुरळीत करण्यात येत आहे. रस्ते आणि घरे यांची दुरुस्ती करण्यासाठी साहाय्याचे वितरण हाती घेण्यात आले असून बेघर लोकांसाठी अन्नपाणी व औषधांची व्यवस्थाही केंद्रीय दलांनी केल्याचे सांगण्यात आले.