कोण भित्रे हे तुमच्या पणजोबांनीच सिद्ध केले: भाजपचे प्रत्युत्तर, लडाख सैन्यमाघारीवर राजकारण, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनसमोर घाबरटपणा दाखविला आहे. त्यांनी भारताची भूमी चीनला दिली, असा आरोप काँगेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे. गुरूवारी संरक्षणमंत्री राजनाथसिंग यांनी राज्यसभेत भारत आणि चीन यांच्या सैन्याधिकाऱयांमध्ये लडाखमधील तणाव संपविण्यासंदर्भात झालेल्या कराराची माहिती दिली होती. त्या संदर्भात राहुल गांधी यांनी हा आरोप केला. मात्र, भाजपनेही या आरोपाला जोरदार प्रत्युत्तर दिले असून, कोण भेकड आहे, हे आपल्या पणजोबांनीच दाखवून दिले आहे, असा टोला लगावला आहे.
भारत आणि चीन यांच्या सैन्याधिकाऱयांमध्ये झालेल्या ठरावानुसार लडाखमधील पँगाँग सरोवर परिसरातून दोन्ही देश आपले पुढे आलेले सैन्य मागे घेऊन एप्रिल 2020 पूर्वीची स्थिती निर्माण करणार आहेत. त्यानुसार चीनने त्याचे सैनिक मागे घेण्यास प्रारंभ केला आहे. चीनचे सैन्य फिंगर 8 पर्यंत मागे हटणार असून भारत फिंगर 3 पर्यंत येणार आहे. हीच स्थिती एप्रिल 2020 मध्ये होती.
मात्र, राहुल गांधींनी भारताने चीनला आपली भूमी घेऊ दिली असा आरोप केला. भारताची भूमी फिंगर 4 पर्यंत होती. आता ती फिंगर 3 पर्यंत आहे. याचा अर्थ फिंगर 3 ते 4 यामधली भूमी चीनच्या घशात गेली असे राहुल गांधी यांचे म्हणणे आहे. पंतप्रधान मोदींमुळे ही हानी झाली असेही त्यांचे प्रतिपादन आहे.
भाजपचा प्रतिहल्ला
राहुल गांधींना अनेक बाबी समजत नाहीत, तसेच त्या समजून घेण्याचा ते प्रयत्नही करत नाहीत. त्यांचे पणजोबा जवाहरलाल नेहरू पंतप्रधान होते तेव्हा 1962 च्या युद्धात भारताचा चीनकडून मानहानीकारक पराभव झाला होता. तसेच त्यांच्या कार्यकाळात लडाखचा भारताच्या आधीन असलेला 38 हजार चौरस किलोमीटरचा प्रदेश चीनच्या घशात जाऊ दिला गेला होता. या उलट पंतप्रधान मोदींच्या कार्यकाळात भारताने आपल्या प्रत्येक इंच भूमीचे संरक्षण केले असून देशाचा कोणताही भाग चीनच्या हाती जाऊ दिलेला नाही. 1962 नंतर काँगेसने कधीही गेलेला भाग परत मिळविण्याचा प्रयत्न केलेला नाही. काँगेसचे हे अपयश झाकण्यासाठीच राहुल गांधी हा कांगावा करीत आहेत, असे प्रतिपादन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांनी शुक्रवारी केले.
सैन्यमाघार हे भारताचे यशच
सैन्यमाघारीच्या करारामुळे पँगाँग भागात एप्रिल 2020 पूर्वीची स्थिती येणार असून तणाव निवळणार आहे. हे काँगेसला नको आहे काय ? सैन्यमाघारीमुळे भारताची हानी होणार हा त्यांचा आरोप धादांत खोटा असून केवळ राजकीय स्वार्थ साधण्यासाठी ते अशी भाषा करत आहेत. त्यांनी बोलण्याआधी माहिती घ्यावी असे प्रतिपादन नड्डा यांनी केले.
गांधींकडून सैनिकांचा अपमान !
भारताच्या सैनिकांनी लडाखच्या अत्यंत दुर्गम भागात अतिशय कष्टप्रद स्थितीत देशाच्या भूमीचे प्राणपणाने रक्षण केले. चीनची डाळ शिजू दिली नाही. आपल्या सीमांचे रक्षण करण्यासाठीच तेथे सेना नियुक्त करण्यात आली असून सैनिक त्यांचे काम चोख बजावत आहेत. अशा स्थितीत भारताने चीनला भूमी घेऊ दिली अशी खोटी विधाने करून राहुल गांधी सैनिकांचा अपमान करीत आहेत, असाही प्रत्यारोप भाजपने केला. त्यामुळे आता यावर राजकारण रंगू लागले आहे.