वार्ताहर / कुदनूर
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. मात्र, अशा परिस्थितीतही आर्थिक व्यवहारासाठी बँकांसमोर नागरिकांची गर्दी होत असल्याचे पाहावयास मिळत आहे. नागरिकांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये या उद्देशाने कालकुंद्री ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने कालकुंद्री पोस्ट कार्यालयामार्फत पंतप्रधान गरीब कल्याण आणि शेतकरी सन्मान योजनांच्या रकमांचे लाभार्थ्यांना वाटप करण्यात आले.
केंद्र सरकारकडून विविध योजनांच्या रकमा लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आल्या आहेत. या रकमा तपासण्यासाठी आणि काढण्यासाठी कुदनूर आणि कोवाड येथील बँकांसमोर परिसरातील नागरिक एकच गर्दी करत असल्याचे निदर्शनास येत आहे. परिणामी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंग पाळले जात नाही. यामुळे बँक कर्मचारी आणि स्थानिक प्रशासनावर मोठा ताण पडत आहे. यासाठी कालकुंद्री ग्रामपंचायतीने सदर योजनांच्या लाभार्थ्यांना इतरत्र न जाता गावातील पोस्ट कार्यालयामार्फत रकमांचे वाटप करण्याचा निर्णय घेतला. यासाठी पोस्टमास्तर सतीश सुतार यांनी चांगले सहकार्य केले असून, सोशल डिस्टन्सिंग पाळत लाभार्थ्यांना रकमांचे वाटप होत आहे. सरपंच विनायक कांबळे आणि उपसरपंच सुरेश नाईक यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी धोका पत्करुन इतरत्र न जाता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन केले आहे.
एईपीएसच्या माध्यमातून रकमांचे वितरण
पंतप्रधान गरीब कल्याण योजनेच्या माध्यमातून १ लाख ७० हजार कोटींचा मदतनिधी जाहीर केला असून, सदर रक्कम जन-धन योजना, मनरेगा योजना, पीएम किसान योजना, उज्ज्वला योजना आदी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात आली आहे. सदर रक्कम एईपीएसच्या माध्यमातून चंदगड पोस्ट कार्यालय आणि तालुक्यातील सर्व डाकघरातून प्राप्त करता येणार आहे. जिल्हा मध्यवर्ती बँक वगळता आधार क्रमांक लिंक असलेल्या सर्व राष्ट्रीयकृत बँकांचे लाभार्थी पोस्ट कार्यालयातून सदर योजनांच्या रकमा काढू शकतात.