अध्याय आठवा
प्रत्येकाच्या गुण अवगुणांचा परामर्ष घेत अवधुतानी जगातल्या प्रत्येकाला गुरु केले. ज्याच्याकडे जो गुण आहे तो घेतला म्हणून तो गुरु आणि ज्याच्याकडे एखादा अवगुण असेल तर तो आपल्यात येऊ नये म्हणून त्यालाही त्यांनी गुरु मानले. या त्यांच्या सवयीमुळे अवधूत सर्व गुणांची खाण झाले. त्यामुळे त्यांच्या जीवनशैलीत कमालीचा फरक पडला. यदु महाराजांनी तो बरोब्बर हेरला आणि अत्यंत विनयाने त्यांच्या शांत, समाधानी वृत्तीचे रहस्य विचारले. त्यावर योगीराज अवधूत म्हणाले, राजा, जवळपास सर्व जगाला मी गुरु केले पण त्यापैकी चोवीस प्रमुख गुरुंची माहिती मी तुला सांगतो म्हणजे योग्याने कोणकोणते गुण घ्यावेत व कोणकोणते अवगुण त्यागावेत हे तुझ्या लक्षात येईल. तू राजा असलास तरी तुझी जातकुळी योग्याचीच आहे म्हणून तू सर्व लक्षपूर्वक ऐक. असे म्हणून त्यांनी एकामागून एक गुरुंच्याबद्दल सांगायला सुरुवात केली. आत्तापर्यंत आपण चौदा गुरुंची माहिती घेतली आता पुढील गुरु मृग याची माहिती अवधुतांकडून करून घेऊ. योग्याने स्त्रीपासून दूर का रहावे हे सांगितल्यावर अवधूत पुढे म्हणाले स्त्री प्रमाणेच पैसा हाही मोठा अनर्थकारी असतो. तो आपले हित साधण्याच्या कामात अडथळा तर ठरतोच पण त्याचबरोबर कधीकधी आपला प्राणसुद्धा घेतो. पैशाचा लोभी असलेला कृपण मनुष्य स्वतः उपाशी राहतो. घरच्यानाही उपाशी ठेवतो. मधमाशीप्रमाणे तो नुसता पैशाचा संग्रह करत असतो. कुणाचे लक्ष जाऊ नये म्हणून मधमाशी दुर्गम कडेकपारीत, उंच झाडाच्या शेंडय़ावर मधमाशा मोठय़ा सायासाने मोहोळ बांधतात आणि आत मध डबडबलेला असतो. तो पाहून कोणत्या उपायाने तो आपल्याला मिळेल या विचारात जग असते. मग झाडेझुडे अरडी दरडी इत्यादी न जुमानता जागच्या जागी जग त्यांना झोडून काढते; अशा रीतीने मध काढणारे लोक मधाच्या कावडी भरतात व श्रीमंत लोक त्याची गोडी घेतात. तसेच कृपणाच्या धनसंग्रहाबद्दल पूर्ण माहिती असल्याने चोर ते धन पळवून नेतात आणि त्यांना पकडून राजा त्या धनावर कब्जा करतो. जे शिणून धनसंग्रह करतात त्यांना त्याचा उपभोग घेता येत नाही. त्या द्रव्याचा उपभोग जे धनसंग्रह करत नाहीत अशी अपरिग्रही मंडळी घेतात. अशी विचित्र दैवगती असते. आणखी ऐक, गृहस्थ मोठय़ा सायासाने अन्न तयार करवितो, तेच संन्यासी काही कष्ट न करता आयते खाऊन जातो. म्हणून जो दैवाच्या आधीन होऊन राहतो, तो संग्रहाची लालसा धरत नाही. ज्याप्रमाणे मधमाशांनी मोठय़ा कष्टाने जमा केलेला मध त्यांच्या आधीच मध काढणारा मनुष्य खातो त्याप्रमाणे गृहस्थांनी मोठय़ा कष्टाने मिळविलेल्या पैशांतून तयार केलेले अन्नपदार्थ त्यांच्या आधीच संन्यासी उपभोगतो. राजा, अर्थसंग्रहाची बाधकता तुला मी सांगितली. त्यानंतर मृगाला म्हणजे हरणाला मी गुरु का केले ते तुला सांगतो. ज्याप्रमाणे स्त्रियांच्या गाण्यांना भुलून पुरुष बंधनात अडकतो त्याप्रमाणे हरणाला पकडण्यासाठी दीप दाखवतात, घंटा वाजवतात आणि त्याला भुलवून फशी पडतात आणि पकडतात. वेश्यांचे गाणे ऐकून ज्याचे चित्त भुलत नाही असा माणूस विरळा.
त्याबाबतीत मी तुला ऋष्यशृंग मुनींची कथा सांगतो. ज्याने आत्तापर्यंत स्त्री पहिली नव्हती असे तापसांचे मुकुटमणी असलेले ऋष्यशृंग मुनी स्त्रीगीताला भुलले. ज्यात रामाचे नाव नसते त्या सर्व गाण्यांना स्रीगीते असे म्हणतात. विवेक विसरून ऋष्यशृंग ऋषी त्या गाणाऱया स्त्रियांच्या मागे धावू लागले. आत्तापर्यंत केलेले तप, विभांडक मुनींसारखा विद्वान बाप, ब्रह्मचर्य हे सगळे विसरून स्त्रियांच्या तालावर नाचू लागले.
योग्याने हे सर्व लक्षात ठेवावे. कोणत्याही प्रलोभनाला भुलू नये. आपले ध्येय काय आहे हे कायम लक्षात ठेवावे. ज्याप्रमाणे मृग भुलून आपणहून पारध्यांच्या स्वाधीन होतो किंवा ऋष्यशृंग मुनी जसे प्रलोभनाला बळी पडून स्त्रियांच्या मागे लागले असे चुकूनही करू नये. मृगाला गुरु करून अवधुतानी हा धडा गिरवला.
क्रमशः