प्रतिनिधी /बेळगाव
शहरातील पाणीटंचाईचे निवारण तातडीने करण्याची सूचना एलऍण्डटी कंपनीला करण्यात आली आहे. पण अद्यापही पाणीसमस्येचे निवारण झाले नसल्याच्या तक्रारी होत आहेत. भाग्यनगर सातवा क्रॉस परिसरात पंधरा दिवसांपासून पाणीपुरवठा न केल्याने पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आल्याने नागरिक संताप व्यक्त करीत आहेत.
चोवीसतास पाणीपुरवठा योजनेच्या अंमलबजावणीमुळे शहरवासियांना पाच दिवसाआड नियमित पाणी मिळत नसल्याने पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. सध्या काही भागात दहा दिवस तर काही भागात पंधरा दिवस पाणीपुरवठा करण्यात आला नसल्याने पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. चोवीसतास पाणीपुरवठा योजनेलादेखील याचा फटका बसला असल्याने संपूर्ण शहरात पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱया जलवाहिन्यांना सातत्याने गळती लागत असल्याने शहरात नियमित पाणीपुरवठा होत नाही. शहर व उपनगरात पाण्याची समस्या निर्माण झाल्याने नागरिकांच्या तक्रारी वाढल्या आहेत.
टिळकवाडी परिसरात मागील पंधरा दिवसांपासून पाणीसमस्या निर्माण झाली होती. या भागातील पाणीपुरवठा सुरळीत झाला आहे. पण भाग्यनगर परिसरात अद्यापही पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही. भाग्यनगर सातवा क्रॉस परिसरात पंधरा दिवसांपूर्वी पाणीपुरवठा केला होता. पण त्यानंतर पाणीपुरवठा झाला नसल्याने रहिवाशांना पाण्याची समस्या भेडसावत आहे. पाणी नसल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे. एलऍण्डटी कंपनीकडे तक्रार केली असता, येत्या दोन दिवसांत पाणीपुरवठा करण्यात येईल, असे सांगण्यात आले होते. पण पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही. टँकरने पाणीपुरवठा करण्याचे सांगितले होते. पण टँकरचाही पत्ता नाही. त्यामुळे भाग्यनगर परिसरातील पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी होत आहे.