प्रतिनिधी / दापोली
निसर्ग चक्रीवादळ होऊन पंधरा दिवसांचा कालावधी लोटला तरी दापोली तालुक्यातील सुमारे 60 टक्के गावे आजही अंधारातच असल्याची धाक्कादायक माहिती पुढे आली आहे. त्यामुळे तालुक्यात 80 टक्के वीज पुरवठा सुरळीत झाल्याची माहिती देणाऱया महावितरणच्या अधिकाऱयांबद्दल संताप व्यक्त होत आहे
निसर्ग चक्रीवादळाने महसूल विभाग, मत्स्य विभाग, वनविभाग यांच्याबरोबर महावितरणचेदेखील अतोनात नुकसान झाले आहे. विद्युत वाहिन्यांवर झाडे पडल्याने तालुक्यात 1100 वीज खांब जमीनदोस्त झालेले आहेत. चक्रीवादळ शमले त्यावेळी महावितरणच्या दापोली कार्यालयात केवळ दहा टक्के सामान शिल्लक होते. टप्प्याटप्प्याने हे सामान येत असून अनेक मार्ग बंद असल्याने घटनास्थळी पोहचणेही शक्य होत नव्हते.
वादळानंतर आठवडाभरात दापोली शहराचा वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला, त्यानंतर लगतच्या गावांमध्ये काम सुरू करण्यात आला. त्यासाठी कोल्हापूर, सांगली, इचलकरंजी येथून महावितरण कर्मचाऱयांच्या 10 टीम दाखल झाल्या आहेत. मात्र, पंधरवडय़ानंतरही हर्णेतील वीज पुरवठा खंडीतच असून त्यापुढील पाजपंढरी, अडखळ, आंजर्ले उटंबर, आडे, पाडले, केळशी येथेही हीच स्थिती आहे. याबाबत उटम्बर येथील याकूबबाबा दर्ग्याच्या मकबूल दिनवारे यांनी तहसीलदारांकडे लेखी तक्रार केली आहे. मुरुड, कर्दे, आसूदचा अर्धा भागदेखील अंधारात आहे.
वाकवली मार्गावर सर्वात कमी हानी झालेली असल्याने 32 गावांतील व दाभोळ मार्गावरील उंबर्ले गावापर्यंत वीज पुरवठा सुरळीत करण्यात यश आलेले आहे. मात्रमाथेगुजर, गावरई, वनोशी त़र्फे नातू गावातील वीज अद्याप गायबच आहे.
खेर्डीत वीजपुरवठय़ाचा दावा फोल
महावितरणने पालगड मार्गावरील खेर्डी गावाचा वीज पुरवठा सुरळीत झाल्याचा दावा केला आहे. मात्र अद्याप वीज आली नसल्याच माहिती ग्रामस्थ अशोक जाधव यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना दिली. प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामपंचायत कार्यालयातदेखील वीज पोहोचली नसल्याने अनेक अडचणी निर्माण होत आहेत. यामुळे महावितरणचे दावे फोल असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.
कुडावळे सबस्टेशनमधून वीज पुरवठा होणाऱया पालवणी गावात वीज सुरू होण्यास चार दिवस लागतील अशी माहिती मिळत आहे. तर जालगाव, मळे, उंबर्ले, दाभोळ, नवसे व ओणी आदी गावांतील वीज पुरवठा सुरळीत करण्यात यश मिळवले असले तरी एलटी खांबांवरील काही ग्राहक अद्याप अंधारात असल्याचे ाढाळकाई कोंड येथील कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले. पालगड मार्गावरील पिसई, वणौशी, पालगड, हातिप, माटवणचा वीजपुरवठा अद्पाही खंडीतच आहे.
दापोली तालुक्यात चक्रीवादळानंतर 15 दिवसांनीदेखील 60 टक्के गावांतील सर्व उपकरणे बंद आहेत. वीज नसल्यामुळे ग्रामस्थांचे पावसाळ्यात पिण्याच्या पाण्याअभावी हाल होत आहेत. अनेक ठिकाणी पागोळीचे पाणी साठवून ते धुणी, भांडी व आंघोळीसाठी वापरत असल्याचे चित्र आहे. वीज पुरवठय़ाअभावी ग्रामीण भागातील बँका, पिठाच्या गिरण्या, मोबाईल, टीव्ही बंद आहेत. राज्यातील महावितरणची सर्व यंत्रणा राबवून वीजपुरवठादेखील पूर्ववत करण्याची मागणी होत आहे.
अनेक घरांची कामे खोळंबली!
वीजेअभावी चक्रीवादळात नुकसान झालेल्या घरांची कामे खोळंबली आहेत. विजेअभावी वेल्डिंग, ड्रिलिंग, कटिंगची घरांची कामे होऊ शकत नाहीत. उडालेले पत्रे बसवता येत नसल्याने अनेकांची घरे ओली होऊन खिळखिळी होत आहेत. काही घरांच्या भिंती पडण्याच्या मार्गावर आहेत. या धोकादायक घरांमध्ये कसे राहायचे, असा प्रश्न ग्रामस्थांसमोर आहे.