पावसाळय़ात पुन्हा पाणी शिरण्याचा धोका
प्रतिनिधी / बेळगाव
कोनवाळ गल्ली नाल्याचे बांधकाम रखडले आहे. नाल्यामध्ये माती आणि झाडा-झुडुपांमुळे पाण्याचा निचरा होण्यास अडथळा निर्माण झाला आहे. अशातच शनिवारी दुपारी झालेल्या पावसामुळे नाल्याच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे परिसरात पुन्हा पाणी शिरण्याचा धोका निर्माण झाला आहे. यापूर्वी असलेली भिंतदेखील ठिकठिकाणी फोडण्यात आल्याने रहिवाशांमध्ये धास्ती वाढली आहे.
शनिवारी दुपारी झालेल्या अर्ध्या तासाच्या पावसात नाल्याच्या पाणी पातळीत मोठय़ा प्रमाणात वाढ झाली. नाल्यात असलेल्या फूटब्रिजवरून पाणी वाहू लागले. या ठिकाणी कोनवाळ गल्लीत पाणी शिरण्याचा धोका निर्माण झाला आहे. नाल्याचे बांधकाम अर्धवट असल्यानेच ही परिस्थिती निर्माण झाल्याची तक्रार कोनवाळ गल्लीतील रहिवासी करीत आहेत. कोनवाळ गल्ली नाल्याची भिंत कोसळून तीन वर्षे उलटली पण या भिंतीचे बांधकाम पूर्ण करण्यात आले नाही. यापूर्वी करण्यात आलेले बांधकाम सहा महिन्यांच्या आतच कोसळले होते. त्यानंतर आमदार निधीतून नाल्याचे बांधकाम करण्यासाठी दीड कोटीच्या निधीची तरतूद केली आहे. नाल्याच्या बांधकामाचा शुभारंभ करून बांधकामास सुरुवात केली होती. पण कोरोनामुळे सदर बांधकाम बंद ठेवले आहे. मात्र, भिंतीचे बांधकाम करण्यासाठी नाल्यात चर खोदली आहे. सांडपाणी वळविण्यासाठी नाल्यामध्ये माती घालण्यात आल्यामुळे नाल्यात अडथळे निर्माण झाले आहेत. येथील ग्रंथालय आणि सार्वजनिक स्वच्छतागृहाच्या मागील बाजूस झाडेझुडुपे वाढली असल्याने सांडपाण्याचा निचरा होण्यास अडथळे निर्माण झाले आहेत. पावसाळय़ापूर्वी नाल्याचे बांधकाम पूर्ण होईल अशी अपेक्षा होती. पण बांधकाम न झाल्याने नाल्याचे पाणी परिसरात शिरण्याचा धोका निर्माण झाला आहे.
नाल्याचे बांधकाम अर्धवट असून, मातीचे ढिगारे कोसळून इमारतीला धोका निर्माण झाला आहे. नाल्याचे बांधकाम करण्याकरिता कोनवाळ गल्ली बाजूने बांधलेली भिंत ठिकठिकाणी फोडून रस्ता केला होता. त्यामुळे या रस्त्यावाटे कोनवाळ गल्लीत नाल्याचे पाणी शिरण्याचा धोका निर्माण झाला आहे. शनिवारी पावसामुळे नाला तुडुंब भरला होता. सलग पाऊस झाल्यास नाल्याचे पाणी कोनवाळ गल्लीत शिरण्याची शक्मयता नाकारता येत नाही.