15 सुलेखनकार अन् 15 गायकांचा सहभाग
‘अक्षर भारत’चे आज उद्घाटन
सिंधुदुर्ग सुपुत्र अच्युत पालव यांची राष्ट्रगीताची अनोखी कल्पना
अजय कांडर / कणकवली:
भारताच्या स्वातंत्र्य दिनाचे महत्व अनन्यसाधारण आहे. यानिमित्त कलाप्रेमी विविध प्रयोग करत असतात. आता सिंधुदुर्ग जिल्हय़ाचे सुपुत्र, विख्यात सुलेखनकार अच्युत पालव यांनीही असाच एक अनोखा प्रयोग केला आहे. त्यांनी पंधरा भारतीय भाषांच्या लिपीमध्ये राष्ट्रगीत साकारले आहे. त्यासाठी भारतातल्या विविध जाती-धर्मातील 15 सुलेखनकारांनी कलेचे योगदान दिले आहे. 15 गायकांनी आपल्या आवाजातून राष्ट्रगीत सादरही केले आहे. शुक्रवार, 14 ऑगस्टला सायंकाळी पाच वाजता अच्युत पालव व एमआयटी या फेसबूक तसेच इंस्टाग्राम पेजवर हे अक्षर भारत राष्ट्रगीत प्रकाशित केले जाणार आहे. दरम्यान, या उपक्रमामुळे सुलेखनाबाबतची जागरूकता समाजात निर्माण होईल, असे मत पालव यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना व्यक्त केले.
अच्युत पालव यांची विख्यात सुलेखनकार अशी ओळख आहे. त्यांचे उपक्रम राष्ट्रीय पातळीवर आयोजित केले जात असल्याने त्यांना विविध भाषा कलाप्रांतातही मानाचे स्थान आहे. त्यांच्या सुलेखनाला विविध कलाप्रांतातल्या विख्यात कलाकारांनी प्रतिसाद दिलेला आहे. या आपल्या सन्मानामुळेच पालव हे भारतातील विविध भाषांतील कलाकारांना एकत्र करून राष्ट्रगीताचा हा अक्षर भारत ते साकारू शकले. याबद्दल त्यांचे कलाप्रांतातून कौतूक होत आहे.
उपक्रमातून देणार एकात्मतेचा संदेश
भारताच्या 47 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त भारतीय भाषातील 15 लिपी एकत्र करून हे राष्ट्रगीत साकारण्यात आले. या राष्ट्रगीताला भारतातल्या 15 सुलेखनकार आणि पंधरा गायकांचाही कला स्पर्श झाला असला, तरी भारताच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त या अक्षर भारत उपक्रमातून एकात्मतेचा संदेश जाणार आहे हे आजच्या काळात अधिक महत्वाचे आहे. त्यामुळे पालव यांच्या या संकल्पनेचे मोल मोठे आहे.
विविध 15 भाषांमध्ये साकारले राष्ट्रगीत
अक्षर भारत या संकल्पनेंतर्गत सुलेखनकार अच्युत पालव यांनी भारताचे राष्ट्रगीत 15 विविध भाषांमध्ये साकारले. यात देवनागरी, ओडिसा, तेलगू, कन्नड, मल्याळम, गुजराती, उर्दू, तामिळ, बोडी, काश्मिरी, बंगाली, आसामी, मैथिली, गुरुमुखी, सिद्धम अशा भाषा लिपींचा समावेश आहे. विशेष म्हणजे भारतातील पंधरा सुलेखनकार एकत्र येऊन हे राष्ट्रगीत लिपी रेखाटन केले आहे. त्यात अच्युत पालव, एस. के. मोहंती, नवाकांथ करीडे, जी. व्ही. स्त्राrकुमार, नारायण भट्टथिरी, गोपाल पटेल, महमूद अहमद शेख, मनोज गोपीनाथ, प्रभसिमर कौर, केतकी गायधनी, अन्वर लोलाबी, हिरेन मित्रा, मनीषा नायक, रुपाली ठोंबरे, अवधूत विधाते आदींचा समावेश आहे.
15 गायकांनी गायिले राष्ट्रगीत
यातील महत्वाची घटना म्हणजे संगीतकार आदिनाथ मंगेशकर यांच्या मार्गदर्शनाखाली 15 गायकांनी हे राष्ट्रगीत स्वरबद्ध केले आहे. तुषार पंके यांनी संकलन, तर कुणाल कुलकर्णी यांनी ध्वनीसंकलन केले आहे. 14 ऑगस्टला सायंकाळी 5 वाजता अच्युत पालव व एमआयटी या फेसबूक तसेच इंस्टाग्राम पेजवर हे राष्ट्रगीत प्रकाशित केले जाईल.
प्र्रत्येकाला आपलेसे वाटेल! भारत शेतीप्रधान जसा देश आहे तसाच तो लिपीप्रधानही आहे. या संकल्पनेतून भारतातील पंधरा लिप्या आणि सुलेखनकार यांना सोबत घेऊन राष्ट्रगीतातील प्रत्येक ओळ मांडली आहे. यामुळे प्रत्येक भारतीयाला आपली लिपी राष्ट्रगीतात पाहता येणार आहे. आपले कौशल्य पणाला लावून काम करण्यात आले आहे. बऱयाच ठिकाणी शाई, कागद यांची टंचाई भासली. सुलेखनाबाबत आता कुठे लोकांमध्ये जागरुकता निर्माण होत आहे. त्या पार्श्वभूमीवर 15 भारतीय लिपीमध्ये राष्ट्रगीत साकारण्याचा माझा संकल्प होता. जेणेकरून प्रत्येकाला ते आपलेसे वाटेल, अशी प्रतिक्रिया अच्युत पालव यांनी व्यक्त केली असून या कलेचा आस्वाद नागरिकांनी घ्यावा, असेही आवाहन त्यांनी केले आहे.