एक कोटीची रक्कम झाली कमी : बिले भरून सहकार्याचे आवाहन
प्रतिनिधी / कणकवली:
सिंधुदुर्ग जिल्हय़ातील 14,992 वीज ग्राहकांची बिले सुधारित करण्यात आली असून त्यामुळे त्यांची एकूण 1 कोटी 8 लाख रुपये रक्कम कमी झाली आहे. तरीही कोणतीही शंका असल्यास त्याचे निरसन करण्याची जबाबदारी महावितरण कंपनीने घेतली आहे. त्यामुळे ग्राहकांनी वीज बिल भरून हा सरकारी वीज उद्योग, महावितरण कंपनी सावरण्यासाठी हातभार लावावा, असे आवाहन वर्कर्स फेडरेशन महाराष्ट्रचे संयुक्त सचिव कॉ. बाळ पवार यांनी केले आहे.
जिल्हय़ातील सर्व वीज ग्राहकांनी मार्च 2020 पासून किंबहुना त्यापूर्वीचीही विजेची बिले ग्राहकांनी भरलेली नाहीत. जानेवारी अखेर सुमारे 35,000 वीज ग्राहकांची तब्बल 28 कोटी रुपयांची थकबाकी एकटय़ा सिंधुदुर्ग जिल्हय़ाची आहे.
कोरोना काळात सार्वजनिक कार्यालये बंद असताना कोरोना महामारीत जीवाची पर्वा न करता, वीज कामगारांनी ग्राहकांना अविरत सेवा पुरविली आहे. त्यामुळेच आपण आपल्या घरात सुरक्षितपणे राहू शकलात. वीज निर्मितीसाठी लागणारे इंधन, साहित्य, सामुग्री महावितरण कंपनीला रोखीने खरेदी करावी लागते व तो पैसा आपण भरत असलेल्या वीज बिलातूनच गोळा करून भरला जातो. आपणास वीज सुरळीतपणे मिळावी, यासाठी लागणाऱया मनुष्यबळाचे वेतन हे वीज बिलातूनच कंपनी कामगारांना अदा करते. आपण वीज बिले भरलीच नाहीत, तर या सर्व गोष्टी करणे महावितरण कंपनीला कष्टप्रद होत आहे. पर्यायाने याचा विपरित परिणाम वितरण व्यवस्थेवर येऊ शकतो, असे पवार यांनी म्हटले आहे.
महावितरण कंपनीने सुलभ हप्त्यात थकीत वीज बिल भरण्याची सुविधा ऍपच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली आहे. वीज बिलांबाबत काही शंका असल्यास उपविभाग व शाखा कार्यालयात अभियंता, अधिकारी व कर्मचारी आपल्या शंकेचे निरसन करण्यासाठी कार्यरत आहेत. महावितरण कंपनीने वीजपुरवठा देयके अचूकच असल्याचा दावा केला असता, ग्राहक पंचायतीचे वीज बिल हाताळणारे जयंत बिवलकर यांनीही तो मान्य करत जाहीर निवेदन दिले होते. त्यामुळे ग्राहकांनी वीज बिल भरून सहकार्य करण्याचे आवाहन कॉ. पवार यांनी केले आहे.