कोरोना विषाणूसंदर्भातील नवी नवी माहिती सातत्याने पुढे येत आहे. संशोधक आणि डॉक्टर्स एकीकडे कोरोनाबद्दल लोकांच्या मनातील गैरसमज दूर करण्याचा जीव तोडून प्रयत्न करत आहेत तर दुसरीकडे या विषाणूबद्दलचे विविध गैरसमज उरी-पोटी घट्ट कवटाळून अनेक लोक आपलाच हेका दाखवित आहेत.
कोरोना फक्त श्रीमंतांना होतो, गरीबांकडे त्याचे लक्ष जात नाही, असा एक गैरसमज उत्तर भारतातील अनेक खेडय़ांमध्ये पसरलेला आहे. याकडे विविध संस्थांच्या कार्यकर्त्यांनी लक्ष वेधले आहे. हे कार्यकर्ते यावेळी कोरोनाविषयी जनजागृती करण्यासाठी ग्रामीण भागात जातात. तेव्हा त्यांना अनेकांकडून ‘सिर्फ पईसावालाके होअत बा कोरोना’ हे वाक्य ऐकावे लागते. अशा लोकांना काय सांगायचे? असा प्रश्न त्यांना पडतो. उत्तर प्रदेशातील गढवा हे गाव असा गैरसमज असणाऱया लोकांनीच भरलेले आहे की काय? असा प्रश्न पडतो.
कोरोनाबद्दल कोणीही काहीही सांगू लागला तरी या गावातील लोक त्याकडे सरसकट दुर्लक्ष करतात आणि आम्ही गरीब असल्याने आम्हाला कोरोना होणे शक्मयच नाही, अशी त्यांची ठाम भावना दिसते. या गावात सामाजिक अंतराचा नियम मुळीच पाळला जात नाही. 7 हजार 500 लोकसंख्येच्या या गावात पाच लोकांना कोरोना झाल्याचे उघड झाले आहे. तरीही त्यांना विलगीकरणात ठेवण्यात आलेले नाही. लोकही त्यांच्यापासून दूर राहात नाहीत, अशी स्थिती केवळ याच गावात नव्हे तर असंख्य गावांमध्ये दिसून येते. जनजागृती करणाऱया कार्यकर्त्यांसमोर हे मोठे आव्हानच उभे आहे.