प्रतिनिधी/ वडूज
सातारा जिह्यातील शिवसेनेची राजकीय स्थिती भक्कम आहे, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून होणाऱया निवडणुका शिवसेना स्वबळावर लढवू शकतात पण, अंतिम निर्णय हा पक्षप्रमुख उद्धव ठाकरेसाहेब घेतली, असे मत शिवसेनेचे उपनेते प्रा. नितीन बानूगडे-पाटील यांनी व्यक्त केले.
वडूज (ता. खटाव) येथील शिवसंपर्क अभियानात ते बोलत होते. यावेळी शिवसेना पक्ष निरीक्षक विशाल पावशे, तात्यासाहेब माने, प्रशांत काळे, जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव, संजय भोसले, शहाजीराजे गोडसे, बाळासाहेब जाधव, महेश गोडसे, विजय पाटील, रवींद्र खाडे, संतोष दुबळे, सा.w छाया शिंदे, सौ. राणी काळे, विजयसिंह फडतरे व स्थानिक शिवसैनिक उपस्थित होते.
प्रा. बानुगडे यांनी सांगितले की, मराठवाडा, विदर्भनंतर पश्चिम महाराष्ट्रात शिवसेनेचा शिवसंपर्क अभियान राबविण्यात येत आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात थेट शिवसैनिकांशी संवाद साधला जात आहे. अडीच वर्षाच्या सत्तेत सर्वसामान्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी शिवसैनिक प्रयत्न करीत आहेत. या योजना तळागाळापर्यंत पोहचतात का? विकास निधी योग्य कारणांसाठी खर्ची पडतो का? या सर्व गोष्टीचा अहवाल शिवसेनेचे वरिष्ठ नेते यांना सादर करण्यात येणार आहे. केंद्राच्या धोरणामुळे वाढती महागाई, बेरोजगारी याबाबत सामान्य माणूस त्रस्त झाले आहेत. त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी शिवसैनिक रस्त्यावर उतरून आपले कर्तव्य पार पाडत आहेत, असे ही प्रा. बानूगडे-पाटील यांनी सांगितले. यावेळी त्यांनी राज्यसभेच्या सहाव्या जागेसंदर्भातही वरिष्ठ निर्णय योग्य पध्दतीने घेतील असे सांगितले.