पाटणा / वृत्तसंस्था :
नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध करणारे संजद नेते प्रशांत किशोर आणि पवन वर्मा यांना बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी गुरुवारी इशारावजा सूचना केली आहे. दुसऱया पक्षात जाण्याची इच्छा असणाऱयांनी निघून जावे, माझ्या शुभेच्छा त्यांच्यासोबत आहेत. हे लोक विद्वान असून त्यांनी माझा आदर केला नसला तरी मी आदर करतो असे नितीश म्हणाले.
काही लोकांच्या विधानांच्या दृष्टीकोनातून संजदकडे पाहिले जाऊ नये. संजद अत्यंत दृढपणे स्वतःचे कार्य करतो. आमची भूमिका स्पष्ट असते आणि आम्ही कुठल्याच मुद्दय़ावर गोंधळात राहत नाही. कुणाच्या मनात काही असल्यास त्याने समोर येऊन चर्चा करावी. पक्षाच्या बैठकीत भूमिका मांडावी असे नितीश म्हणाले.
माजी खासदार वर्मा यांनी नागरिकत्व सुधारणा कायद्यासंबंधी पक्षाच्या निर्णयाच्या विरोधात नितीश कुमार यांना पत्र लिहिले होते. नितीश यांनी एनआरसी आणि सीएए यासारख्या ज्वलंत मुद्दय़ावर स्वतःची भूमिका स्पष्ट करावी. नितीश यांनी माझ्या पत्राला उत्तर दिल्यावरच पक्षात राहावे की नाही याचा निर्णय घेणार असल्याचे वर्मा यांनी म्हटले होते.
दिल्ली विधानसभा निवडणुकीत संजदने भाजपसोबत आघाडी केली आहे. या आघाडीच्या निर्णयाला वर्मा यांनी विरोध दर्शविला आहे. संजदसोबत भाजपची आघाडी बिहारपुरती मर्यादित होती, या आघाडीच दिल्लीमध्येही विस्तार करण्यात आला आहे. हा निर्णय पक्षात विचारविनिमय तसेच वैचारिक स्पष्टीकरणानंतर घेण्यात आला आहे का अशी विचारणा वर्मा यांनी केली आहे.
संजदने प्रशांत किशोर आणि पवन वर्मा यांच्या विधानांना शिस्तभंग मानले आहे. वर्मा आणि किशारे यांची संजदच्या निर्मितीत कुठलीच भूमिका राहिलेली नाही. त्यांनी अन्य पक्षात जाण्याचा निर्णय घेतला असल्यास त्यांना मार्ग मोकळा आहे. त्यांची विधाने पाहिल्यास ते अन्य पक्षांच्या संपर्कात असल्याचे स्पष्ट होते असे संजदचे प्रदेशाध्यक्ष वशिष्ठ नारायण सिंग यांनी म्हटले आहे.