विरोधकांच्या लक्षवेधी सूचनांवर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे विधानसभेत उत्तर,लवकरच सरकारची याचिका येणार सुनावणीस
मुख्यमंत्री म्हणाले…
- कर्नाटकने लवाद, न्यायालयाचा आदर राखला नाही
- बेकायदेशीरपणे म्हादईचे पाणी पळविले हे सत्यच
- कर्नाटकात भाजप सरकार असले तरी तडजोड नाही
- चाळीसही आमदार म्हादईप्रश्नी एकत्र राहूया
- मुख्यमंत्री बनल्यापासून म्हादईसाठी आपण खूप प्रयत्न केले
- समुद्राचे खारे पाणी गांजे धरणापर्यंत पोहोचण्याची भीती
विरोधक म्हणाले…
- प्रकाश जावडेकरांनी समिती स्थापन केली काय? : दिगंबर कामत
- ओपा जलप्रकल्प, दुधसागर धबधबाही आटून जाईल : ढवळीकर
- कर्नाटकने खास म्हादईसाठीच 500 कोटींची तरतूद : सरदेसाई
- गोव्याच्या वकिलांनी म्हादई कर्नाटकला विकली : रोहन खंवटे
प्रतिनिधी / पणजी
म्हादई ही माझ्यासाठी आईसमानच आहे, याचा या सभागृहात पुनरुच्चार करत असून तिचे रक्षण आणि संवर्धनासाठी कोणतीही तडजोड करणार नाही, तसेच कुणाच्याही समोर झुकणार नाही, असे स्पष्ट आश्वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिले. म्हादईप्रश्नी आमच्यावर कोणताही अन्याय होऊ देणार नाही, असे सांगून पक्षहितापेक्षा आपणाला म्हादईचे हित सर्वोच्च आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
कर्नाटक कडून म्हादईचे पाणी वळविण्याच्या प्रकारावर विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, विजय सरदेसाई, रोहन खंवटे, रवी नाईक, प्रसाद गावकर, जयेश साळगावकर, लुईझीन फालेरो, रामकृष्ण ढवळीकर, आलेक्स लॉरेन्स आणि विनोद पालयेकर यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेवर मुख्यमंत्री बोलत होते.
कर्नाटकने लवाद, न्यायालयाचा आदर राखला नाही
म्हादई लवाद किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयांचा व आदेशांचा आदर न राखता कर्नाटकाने बेकायदेशीररित्या म्हादईचे पाणी वळविले आहे हे सत्य आहे. आपण स्वतः याची पाहणी केली आहे. तसेच काही सदस्यांनी त्यासंबंधीचे छायाचित्र पुरावेही सादर केलेले आहेत. त्यामुळे या विषयत मी स्वतः सर्वाधिक गंभीर आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
कर्नाटकात भाजप सरकार असले तरी तडजोड नाही
म्हादई विषयावरून सरकार कोणतेही राजकारण करत नाही आणि करणारही नाही. त्याचप्रमाणे कर्नाटकात भाजप सरकार असले तरीही कोणतीही तडजोड करणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मतभेद विसरुन चाळीसही आमदार म्हादईप्रश्नी एकत्र राहूया
एरव्ही आमच्यात कितीही राजकीय मतभेद असले तरीही गोवा आणि गोमंतकीयांच्या हितासाठी म्हादईच्या प्रश्नी आम्ही सगळे एकत्र राहुया. गरज भासल्यास सर्व चाळीसही आमदार दिल्लीत जाऊन शक्तीप्रदर्शन करुया, आम्हाला कायदेशीर न्याय निश्चित मिळेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
मुख्यमंत्री बनल्यापासून म्हादईसाठी आपण खूप प्रयत्न केले
वर्ष 2002 मध्ये हा विषय सुरू झाला होता. आपण मुख्यमंत्री बनल्यानंतर गृहमंत्री तसेच पंतप्रधान यांची भेट घेऊन विषय मांडलेला आहे. आतापर्यंत हा विषय जलसंवर्धन खात्यापर्यंत पोहोचला नव्हता, आम्ही तो पोहोचवला आहे. म्हादईप्रश्नी मी गंभीर आहे, सतत पाठपुरावा करत आहे. त्यामुळेच पुढील 15 ते 20 दिवसात म्हादईची याचिका सुनावणीस येणार आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
समुद्राचे खारे पाणी गांजे धरणापर्यंत पोहोचण्याची भीती
म्हादईमुळेच नद्यांच्या खाऱया आणि गोडय़ा पाण्याचे संतुलन राखले जाते. अशावेळी म्हादईचे पाणी वळविल्यास खाऱया पाण्याचे प्रमाण प्रचंड वाढणार आहे. काही वर्षांपूर्वी कोठंबीपर्यंत खारे पाणी असायचे, आता ते उसगाव पूलापर्यंत पोहोचले आहे. म्हादईचे पाणी कमी आणखीही कमी झाल्यास समुद्राचे खारे पाणी गांजे धरणापर्यंत पोहोचण्याची भीती असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
कर्नाटक सत्य लपवून म्हादई वळवित आहे : ढवळीकर
सुदिन ढवळीकर यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण भाषण करताना म्हादईसंबंधी सद्यस्थितीचे दर्शन घडविणारी छायाचित्रे सभागृहात सादर केली. एरव्ही कर्नाटककडे सुपा आणि मलप्रभा या नद्या आहेत आणि त्यात मुबलक पाणी आहे. परंतु हे सत्य लपवून ते मुद्दाम म्हादई वळवित आहेत. त्यांना खरोखरच पाण्याची गरज असेल तर सुपा धरण केवळ 40 किमी अंतरावर आहे, तरीही 140 किमी दूर अंतरावर असलेल्या म्हादईचे पाणी त्यांनी वळविले आहे. कर्नाटकचे मंत्री जर आपल्या राज्याच्या हितासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात तर गोव्यातील मंत्रीही त्याच मार्गाने का जाऊ शकत नाहीत, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
… तर ओपा जलप्रकल्प, दुधसागर धबधबाही आटून जाईल
आम्हाला खरोखरच म्हादईचे रक्षण करायचे असेल तर त्यासाठी स्वतःच्या गोमंतकीयत्वाचा अभिमान असला पाहिजे. कर्नाटकची दादागिरी अशीच चालू राहिल्यास आणि गोव्याने मवाळ धोरण ठेवल्यास एक दिवस ओपा पाणी प्रकल्प बंद पडेल व दूधसागर धबधबाही आटून जाईल, पर्यायाने कुळागरे, शेती नष्ट होतील, व आत्मनिर्भर भारत करण्याचे स्वप्नही संपुष्टात येईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.
कर्नाटकने खास म्हादईसाठीच 500 कोटींची तरतूद : सरदेसाई
आमदार विजय सरदेसाई यांनी म्हादईप्रश्नी महत्वपूर्ण मुद्दे उपस्थित केले. हा प्रश्न आपणही सातत्याने उपस्थित करत आलो आहे, त्यासंबंधी ड्रोनद्वारे चित्रीकरण करून सत्यस्थिती लोकांसमोर आणण्याचा प्रयत्नही केला होता, असे त्यांनी सांगितले. आता तर कर्नाटकाने आपल्या अर्थसंकल्पात खास म्हादईसाठी 500 कोटींची तरतूद केली आहे. त्यावरून कर्नाटक म्हादईसाठी कोणत्याही थराला जाऊ शकते, अशी भीती व्यक्त करून गोव्याने सावध राहिले पाहिजे, असे सांगितले.
प्रकाश जावडेकरांनी समिती स्थापन केली काय? : दिगंबर कामत
विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी बोलताना यापूर्वी म्हादईप्रश्नी सर्वपक्षीय शिष्टमंडळाने केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांची भेट घेतली होती. तेव्हा समिती स्थापन करण्याचे आश्वासन दिले होते, त्याची पूर्तता त्यांनी केली का? तसेच नाही केली असेल तर का केली नाही? असे सवाल उपस्थित केले.
गोव्याच्या वकिलांनी म्हादई कर्नाटकला विकली : खंवटे
रोहन खंवटे यांनी गोव्याच्या वकिलांनी योग्य बाजू न मांडता म्हादई कर्नाटकला विकली, असा आरोप करताना अशा वकिलांना यापुढे ठेवायचे की नाही याचा विचार व्हावा, अशी मागणी त्यांनी केली. लुईझिन फालेरो, माजी जलस्रोतमंत्री विनोद पालयेकर, आलेक्स लॉरेन्स, चर्चिल आलेमाव यांनीही विचार मांडले.
अजूनही आम्ही हरलेलो नाही, केवळ पाणी गमावले : जलस्रोतमंत्री
या प्रश्नावर उत्तर देताना जलस्रोत मंत्री फिलीप नेरी रॉड्रिगीश यांनी म्हादईचा सदर विषय हा सुमारे 30 वर्षे जुना आहे. वेळोवेळच्या सरकारने त्यात योगदान दिलेले आहे. रक्षणासाठी आम्ही शक्य ते सर्व प्रयत्न केले आहेत. अजुनही आम्ही कायदेशीर लढा हरलेलो नाही, आम्ही केवळ पाणी गमावले आहे, त्यासाठी यापुढे एकत्रितपणे हा विषय हाताळला पाहिजे, असे ते म्हणाले.