पाणीपुरवठा कामगारांच्या समस्यांवर तोडगा काढण्याचा मनपा आयुक्तांचा प्रयत्न : लेखी आश्वासन दिले नसल्याने बोलणी फिसकटली
प्रतिनिधी / बेळगाव
दोन महिन्यांपासून पगार देण्यात आला नसल्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात बुधवारपासून धरणे आंदोलन करण्यात आले. याची दखल एल ऍण्ड टी कंपनीने घेतली नसल्याने हंगामी कामगारांनी गुरुवारी सकाळी महापालिका कार्यालयाला धडक दिली. कार्यालयासमोर धरणे धरून पगार देण्याची मागणी केली. अखेर सर्व कामगारांचा पगार देण्याबरोबरच समस्यांचे निवारण करण्याचे आश्वासन महापालिका आयुक्त रुदेश घाळी आणि एल ऍण्ड टी कंपनीचे व्यवस्थापक हार्दिक देसाई यांनी दिले. मात्र लेखी दिल्यासच आंदोलन मागे घेऊ, अशी भूमिका कामगारांनी घेतली. त्यामुळे शहराच्या पाणीपुरवठय़ावर परिणाम होण्याची शक्मयता आहे.
शहरात चोवीस तास पाणीपुरवठा योजनेचे विस्तारीकरण करण्यात येत आहे. त्यामुळे पाणीपुरवठा मंडळाच्या 354 कामगारांना एल ऍण्ड टी कंपनीकडे वर्ग केले आहे. सदर कामगारांचा एक महिन्याचा पगार व्यवस्थित देण्यात आला. पण त्यानंतर काही कामगारांच्या पगारात कपात केली आहे. तसेच काही कामगारांना ईएसआय व पीएफची रक्कम देण्यात आली नाही. तसेच काही कामगारांचे वेतन दोन महिन्यांपासून दिले नसल्याने हंगामी तत्त्वावर काम करणाऱया कामगारांनी बुधवारी सकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात धरणे आंदोलन छेडले होते. वेळेवर पगार द्या, तसेच कपात थांबवावी आणि ईएसआय-पीएफची रक्कम देण्यात यावी, अशा विविध मागण्या करण्यात आल्या होत्या. पण एल ऍण्ड टी कंपनीकडून कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे संतापलेल्या कामगारांनी गुरुवारी सकाळी थेट महापालिका कार्यालयाला धडक दिली.
सदर कामगार महापालिकेचे असून हिडकल पाणीपुरवठा योजना राबविताना पाणीपुरवठा मंडळाकडे हस्तांतर केले होते. आता 24 तास पाणीपुरवठा योजनेचा विस्तार करण्यात येणार असून सदर कामाची निविदा एल ऍण्ड टी कंपनीला मंजूर झाली आहे. त्यामुळे पाणीपुरवठा मंडळाकडे काम करणाऱया सर्व कामगारांना एल ऍण्ड टी कंपनीकडे वर्ग करण्याचा आदेश राज्य शासनाने बजावला होता. त्यानुसार 354 कामगार एल ऍण्ड टी कंपनीकडे रुजू झाले होते. पण वेतन देण्यात आले नसल्याने कोणाकडे दाद मागायची, असा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे गुरुवारी सकाळी महापालिकेत धाव घेऊन कार्यालयासमोर धरणे धरली. याची दखल घेऊन महापालिका आयुक्त रुदेश घाळी यांनी पाणीपुरवठा कामगारांची विचारणा केली असता समस्यांची माहिती देण्यात आली.
दोन वर्षांकरिता हंगामी कामगार
एल ऍण्ड टी कंपनीकडे वर्ग
एल ऍण्ड टी कंपनीकडून दोन महिन्यांचे वेतन देण्यात आले नाही. तसेच काही कामगारांचे वेतन कपात करण्यात आल्याची तक्रार करण्यात आली. त्यामुळे एल ऍण्ड टी कंपनीच्या व्यवस्थापकांना बोलावून घेण्यात आले. यावेळी कामगारांशी चर्चा करून समस्या जाणून घेण्यात आल्या. कामगारांच्या वेतनाबरोबरच कायमस्वरुपी सेवा देण्याबाबत पुढील धोरण काय? अशी विचारणा कामगारांच्यावतीने करण्यात आली. सध्या दोन वर्षांच्या कालावधीकरिता हंगामी कामगारांना एल ऍण्ड टी कंपनीकडे वर्ग करण्यात आले आहे. त्यानंतर या कामगारांना पुन्हा महापालिकेकडे वर्ग केले जाईल. त्यापुढे शासनाकडून निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती एल ऍण्ड टी कंपनीचे व्यवस्थापक हार्दिक देसाई यांनी दिली. तसेच सर्व कामगारांचे वेतन व अन्य लाभ देण्यात येतील, कामगारांनी गैरसमज करून घेऊ नये, असे सांगितले.
कामगारांच्या समस्या जाणून घेऊन कामगारांना सेवेत कायम करण्याबाबत शासनाकडे पत्र पाठविण्यात येईल, असे महापालिका आयुक्तांनी सांगितले. एल ऍण्ड टी कंपनीने वेतन देण्याची मागणी मान्य केली. मात्र मौखिक आश्वासन नको, मागण्या मान्य असल्याचे लेखी स्वरुपात द्या, अशी भूमिका हंगामी कामगारांकडून स्पष्ट करण्यात आली. पण लेखी स्वरुपात देण्यास नकार देण्यात आल्याने आंदोलन मागे घेण्यास कामगारांनी नकार दिला. त्यामुळे शुक्रवारी डॉ. आंबेडकर उद्यानात आंदोलन सुरूच राहणार असल्याचे सांगण्यात आले.