शिक्षणाधिकाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष देण्याची गरज
वार्ताहर / शिये
शाळांनी पालकांच्या मागणीनुसार दाखले देणे बंधनकारक आहे. पटसंख्या कमी होऊन शिक्षक संख्या कमी होईल. म्हणुन शिक्षक वाचविण्यासाठी काही शाळा दाखले देण्यासाठी चालढकल करत असल्याने पालकांची ससेहोलपट होत आहे. याकडे शिक्षणाधिकाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.
दरवर्षी शैक्षणिक वर्ष हे जून महिन्यात सुरू होते. त्यानंतर पालकांकडून व माध्यमिक शाळांकडून विद्यार्थ्यांच्या दाखल्याची रितसर मागणी प्राथमिक शाळेकडे करण्यात येते. शाळामध्ये पटसंख्या किती आहे. दाखले किती आले किती गेले. याविषयची माहिती देण्यासाठी ऑगष्ट महिन्यात जिल्हा परिषदेच्यावतीने कॅम्प घेण्यात येतो. कोविडमुळे चालु वर्षी हा कॅम्प सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये घेण्यात येणार आहे. त्यामुळे प्राथमिक, माध्यमिक शाळांमध्ये सध्या पटसंख्या निश्चित करण्याचे काम सुरू आहे. यासाठी माध्यमिक शाळांकडून पालकांना दाखले आणण्यासाठी सांगितले जात आहे. पण प्राथमिक शाळांकडून पटसंख्या कमी होवुन शिक्षक कमी होण्याच्या भितीने दाखले दिले जात नाहीत. सप्टेंबर महिना संपला की दाखला देवू असे सांगितले जात आहे. त्यामुळे पालकांच्या मागणीनंतर ही दाखले न देणाऱ्या शाळांच्या पटसंख्येची काटेकोरपणे चौकशी व्हावी व विद्यार्थ्यांचे दाखले वेळेत मिळावेत अशी मागणी पालकांतून होत आहे.
शासनाच्या धोरणानुसार वीस विद्यार्थ्यांची एक तुकडी व त्या तुकडीला एक शिक्षक पाहिजे. काही प्राथमिक, माध्यमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या किमान पटसंख्ये अभावी शिक्षक संख्या कमी होत आहे. या कडे शिक्षण विभागाने गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे.
शिक्षकनेते कृष्णात कांरडे
पालकांनी आपल्या पाल्यांला कोणत्या शाळेत घालायचे हा पालकांचा प्रश्न आहे.पालकांनी जर शाळेकडे रितसर दाखल्याची मागणी केली असेल तर दाखला देणे शाळेला बंधनकारक आहे.