सेन्सेक्स 1,325.34 अंकानी वधारला : एसबीआय समभाग तेजीत
वृत्तसंस्था / मुंबई
चालू आठवडय़ातील शेवटच्या दिवशी शुक्रवारी सकाळी शेअर बाजार सुरु होताना सेन्सेक्स तीन हजारहून अधिक अंकानी तर दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजारातील निफ्टीही 900 अंकानी घसरला होता. त्यामुळे शेअर बाजारातील व्यवहार काही वेळ बंद ठेवण्यात आले होते. काही वेळानंतर मात्र बाजार सावरल्याचे दिसून आले आहे. दिवसभरातील व्यवहारानंतर अंतिम क्षणी सेन्सेक्स 1,325.34 अंकानी वधारुन निर्देशांक 34,103.48 वर बंद झाला आहे. दुसरीकडे निफ्टी दिवसअखेर 365.05 अंकानी वधारुन निर्देशांक 9,955.20 वर बंद झाला आहे. यामुळे शुक्रवारी झालेली नुकसान भरपाई भारतीय शेअर बाजाराने भरुन काढल्याने काहीसा गुंतवणूकदारांना दिलासा मिळाला आहे.
जगासह भारतातही कोरोनाची चिंता वाढत असून या पार्श्वभूमीवर निम्मा भारत बंद झाल्याचे चित्र असून यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार वेगाने नियोजन आखत आहेत. गुंतवणूक करताना गुंतवणूकदारांनी सावधगिरी बाळगण्याची शक्यता असल्याचे तज्ञांनी म्हटले आहे. यात जगातील अब्जवधींशांची संपत्ती मोठय़ा प्रमाणात घटली असल्याची माहिती आहे.
काही वेळ बाजार बंद
मुंबई शेअर बाजार सुरु होण्याअगोदच मोठय़ा प्रमाणात कोसळला होता, त्यामुळे बाजार सुरु झाल्याच्या 15 मिनिटानंतर तो जवळपास 45 मिनिटापर्यंत बंद ठेवण्यात आला होता. अशी स्थिती 1987 नंतर प्रथमच निर्माण झाल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
मुख्य समभागाची कामगिरी
दिवसभरातील व्यवहारात स्टेट बँकेचे समभाग सर्वाधिक म्हणजे 13 टक्क्यांनी वधारले असून सोबत टाटा स्टील, एचडीएफसी, सन फार्मा, बजाज फायनान्स, भारती एअरटेल आणि आयसीआयसीआय बँक यांचे समभाग तेजीत राहिले आहेत. दुसऱया बाजूला नेस्ले इंडिया, एशियन पेन्ट्स, हिंदुस्थान युनिलिव्हर, हिरोमोटो कॉर्प आणि एचसीएल टेक यांचे समभाग मात्र घसरणीसह बंद झाले आहेत.