मडगाव पालिकेकडून कारवाई, ‘स्ट्रक्चरल ऑडिट’ करून घेणार
प्रतिनिधी/ मडगाव
मडगावच्या गांधी मार्केटजवळील काझा मिनेझिस या इमारतीचा भाग कोसळण्याची घटना घडल्याने आणि या घटनेत शेजारच्या गुरू आशिष इमारतीचीही हनी झाल्याने या दोन्ही इमारतींत राहणाऱयांना सुरक्षेच्या कारणास्तव इमारत खाली करण्याची नोटीस मडगाव पालिकेने बजावली आहे. यासंदर्भात दोन्ही इमारती किती भक्कम आहेत हे जाणून घेण्यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याला स्ट्रक्चरल ऑडिट करण्यास सांगितले जाणार असून त्यांचा अहवाल आल्यानंतर जिल्हाधिकाऱयांमार्फत पुढील प्रक्रिया मार्गी लावली जाईल, असे पालिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
2012-13 मध्ये तयार झालेल्या जीर्ण इमारतींच्या यादीत अत्यंत वाईट स्थितीत असलेल्या काही इमारतीचा समावेश नव्हता याला पुष्टी मडगावातील गांधी मार्केटजवळील जुन्या इमारतीचा भाग कोसळल्याने मिळाली आहे. दशकभरापूर्वी मडगाव पालिकेने वाईट स्थितीत असलेल्या सुमारे 22 इमारतींची यादी तयार केली होती. 2014 मध्ये जेव्हा शॅडो कौन्सिलला ही सूची मिळाली, तेव्हा आम्ही या निवडलेल्या यादीतील इमारती रिअल इस्टेट डेव्हलपर्सच्या हिताशी संबंधित असून त्या यादीमध्ये सोयीस्करपणे टाकलेल्या आहेत, तर इतर बऱयाच इमारती त्यापेक्षा वाईट स्थितीत असल्याचे नजरेस आणून दिले होते, असे निमंत्रक सावियो कुतिन्हो यांनी दावा करताना सांगितले.
धोकादायक इमारतींच्या यादीत उल्लेख नव्हता
गांधी मार्केटजवळ शनिवारी पहाटे कोसळलेली इमारत पालिकेच्या त्या यादीत नव्हती याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे. जुन्या इमारतीच्या पडझडीमुळे शेजारच्या इमारतीचे नुकसान झाले आहे आणि त्याकडे तातडीने लक्ष देणे आवश्यक आहे, असे त्यांनी म्हटले आहे. शेजारच्या इमारतीचे उंच खांबे आहेत, त्यातील एक टाय-बीम तुटला आहे. जुन्या इमारतीचा उर्वरित भाग स्पष्टपणे खूप कमकुवत असून इतर खांबे आणि टाय बीम कोसळून नुकसान करू शकतात. हे उंच खांबे इमारतीच्या वरच्या मजल्यांवरील निवासी फ्लॅट्सना आधार देतात. म्हणूनच कोणतीही आणखी आपत्ती टाळण्यासाठी तातडीने कारवाई करणे आवश्यक आहे, असे सांगून त्यांनी सावध केले आहे.
शहरातील जीर्ण आणि धोकादायक इमारतींचे पुनरावलोकन आणि पुनर्मूल्यांकन करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. त्यानंतर योग्य कारवाई करावी असे कुतिन्हो यांनी सूचित केले आहे. मडगाव पालिका आणि फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांना त्यांनी आठवण करून दिली आहे की, जुन्या बाजारातील पालिकेच्या ऐतिहासिक महत्त्व असलेल्या जुन्या इमारतीकडे पूर्ण दुर्लक्ष केले गेले आहे. सदर इमारत जतन करण्यासाठी त्वरित पावले उचलावीत अन्यथा ही वारसा इमारत कायमची लुप्त होईल, असे कुतिन्हो यांनी म्हटले आहे.