राज्यातील चित्रपट आणि नाटय़गृहे 50 टक्के आसन क्षमतेने सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारच्या सांस्कृतिककार्य मंत्रालयाने जाहीर केला आहे. त्याचे स्वागतच केले पाहिजे. टीव्ही मालिकांद्वारे विशिष्ट प्रकारची करमणूक करून घेण्यातच किंवा फुकट मिळते म्हणून तेच पाहण्यात रसिक धन्यता मानत नाहीत हे निश्चित. सरकारने सक्ती केली नसती तर अनेक गावात आणि शहरांमध्ये प्रयोग सुरूच राहिले असते. कलाकारांना उपासमारीला सामोरे जावे लागले नसते. राज्यातल्या काही भागांमध्ये निवडणुका असताना लोक एकमेकाला खेटून नेत्यांची सभा ऐकत होते. सत्तेतील असोत की विरोधक नेते, सर्वांनी एकमेकाच्या इर्षेवर सभा घेतल्या. गर्दी करण्यासाठी प्रति÷ा पणाला लावली. त्यावेळी कोरोना नेमका कुठे गेला होता? मात्र आता दोन वर्षानंतर नाटय़गृहे पुन्हा सुरू करताना किंवा मल्टिप्लेक्सना परवानगी देताना जो बाऊ करण्याचे नेमके कारण काय? न्यायालयाच्या आदेशानंतर कोरोनाची भीती आहे म्हणून सरकारने अकरावीच्या पात्रता परीक्षा रद्द केल्या पण त्याच नंतर दोन दिवसाने पाचवी आणि आठवीच्या त्याहून लहान मुलांसाठी शिष्यवृत्ती आणि केंद्राच्या जवाहर नवोदय विद्यालय प्रवेशासाठी परीक्षा मात्र घेतल्या! हा विरोधाभास न्यायालय आणि राज्यकर्त्यांच्या लक्षात कसा येत नाही. शाळा सुरू होतात मात्र महाविद्यालये कधी सुरू करायची यावरून गोंधळ उडतो. ग्रामीण महाराष्ट्रात महिनाभरापूर्वीच शाळा, महाविद्यालये सुरू झाली तरी विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यात शिक्षणाला सासुरवास सोसावा लागतोय. तिथल्या एका प्राचार्यांनी महापालिकेच्या आदेशाला मानून कॉलेज सुरु केले. इतर प्राचार्य शिपायांना धूळ झटकायचाही आदेश देत नाहीत! ज्ञानी मंडळींच्या क्षेत्रांमध्ये असा प्रकार सुरू असेल तर सिनेमा आणि नाटक किंवा तमाशा या क्षेत्राकडे येणारी मंडळी तर त्यांच्या मनाने अल्पशिक्षितच! एखादा कसलेला नट दहावी, बारावीत घसरलेला किंवा चांगला संगीतकार बारावी नंतरचा एखादा डिप्लोमा करून विशारदपद मिरवणारा! ती मंडळी या प्रकाराने अधिक गोंधळून गेली तर आश्चर्य वाटायचे कारण नव्हते. पण तरीही माणसांमध्ये वावरल्यामुळे आलेले अस्सल शहाणपण त्यांना समोर आलेल्या परिस्थितीवर मात करण्याची प्रेरणा देत असते. सरकारने पन्नास टक्के क्षमतेचे नाटय़-चित्रपटगृहे सुरू करण्याचे आदेश दिले असले तरी तेवढय़ा क्षमतेवर सुद्धा आपली कला सादर करायला ते तयार झाले. मुळातच नाटक, तमाशाचा सारा खेळ बेभरवशाचा. तिकिटाच्या खिडकीवर जेव्हा गर्दी होईल तेव्हाच पुढच्या क्षणाला नाटक होणार की नाही हे त्यांना समजते. चित्रपटगृहवाले यापेक्षा जास्त समंजस! ते समोर गर्दी नसेल तर खेळ चालवत नाहीत. पण तमाशा, नाटक सादर करणारे कलाकार रसिकांना मान द्यायचा म्हणून 25 टक्के भरलेल्या नाटय़गृहातसुद्धा आपली कला सादर करायला आणि प्रसंगी तोटा सहन करूनही राबायला तयार असतात. सामान्य परिस्थितीमध्ये सुद्धा ग्रामीण महाराष्ट्रात अशा पद्धतीने अनेक कलाकारांनी आणि संस्थांनी कार्यक्रम सादर केलेले आहेत. कोरोना काळानंतर मायबाप रसिकाच्या खिशात किती रक्कम आहे याचा विचार न करता कला सादर करायची संधी मिळाली या आनंदाने ती मंडळी नाटय़गृहावर येणार आहेत. गावोगावी उघडय़ावर कला सादर करायला परवानगी बहुदा नसावीच. कारण आदेशात उल्लेखच नाही! मध्यंतरीच्या काळात वादळी वारे, चक्रीवादळ, अतिवृष्टी, महापूर अशा अनेक आव्हानांना नाटय़गृहांनी तोंड दिलेले आहे. त्यांच्या नुकसानीचे आकडे सरकारच्या कुठल्याही कागदावर नोंदले असतील असे वाटत नाही. आणि नोंदवले तरी नुकसानीइतकी भरपाई मिळण्याची शक्मयता नाहीच. जनरेटर किंवा वायरिंग खराब झाले, साऊंड सिस्टिमचे वाटोळे झाले तर त्याची भरपाई करण्याची सरकारकडे कोणती तरतूद आहे? ज्या-त्या जिह्याच्या नियोजन मंडळाने आपल्या निधीतून अशा कामासाठी पैसे द्यायचे असतात आणि तिथले सांस्कृतिक वातावरण सदैव प्रफुल्लीत राहील हे पाहायचे असते असे किती जिल्हाधिकाऱयांना माहित असेल? कलेच्या सर्वच क्षेत्राशी संबंध येणाऱया राजकारण्यांची संख्या पुरेशी नसल्याने ही स्थिती! नाटय़ आणि साहित्य संमेलनाच्यावेळी लागणारे कोट-सव्वा कोट रुपये उभे करून देण्याहून आपल्या गावातील नाटय़गृहे सावरणे कलाकारांना मदत देऊन उभे करणे हे आपले काम त्यांना वाटत नाही. निवडणुकीच्या काळात युवा वर्गाला आकर्षित करण्यासाठी महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा घ्याव्यात, बक्षीस वाटप करावे आणि सोडून द्यावे. ही मानसिकता. तमाशा ही तर अभिजनांचेही नाक मुरडणारी कला. तिथे तर कोल्हाटी, मातंग, पारधी अशी मागास मंडळीच कलाकार. त्यांची दखल कोण घेतो? पण ही सगळीच मंडळी आपली कला सुरु करण्यासाठी सरकारने पैसे द्यावेत अशी मागणीही करत नाहीत. सरकारने खरे तर अशा प्रयोगांसाठी काही निधी स्वयंप्रेरणेने जाहीर करणे आवश्यक होते. पण राजाला जर रोजचा खर्च भागवण्याची चिंता असेल तर त्याच्यात उदार, दानशूरपणा तर येणार कुठून? त्यामुळे जशा कशा पद्धतीने हे क्षेत्र सुरू होत आहे त्याचा पडदा उठावा आणि खेळ सुरू व्हावा या पेक्षा वेगळय़ा शुभेच्छा या क्षेत्राला देता येत नाहीत. पहिल्या लाटे नंतर सरकारने परवानगी देऊ केली मात्र नाटक सुरू झाले आणि धाडसाने उतरलेल्या एका निर्माता, अभिनेत्यालाच कोरोनाने वेढले. त्यामुळे आम्ही धोका सांगत होतो ना? असे म्हणणाऱया मंडळींचे फावले आणि हे क्षेत्रच पंगू बनून गेले. आता या नाटय़ आणि चित्रपट रसिकांची गळचेपी न करता त्यांना मुक्तपणे या कलांचा आनंद घेऊ द्या आणि जितक्मया लवकर होईल तितक्मया लवकर समाधानाने आणि समूहाने अनुभवानंद घ्यायच्या या कलेचा 100 टक्के आस्वाद घेऊ द्या. इतकीच मायबाप सरकारला आणि सांस्कृतिक क्षेत्रावर प्रेम, आपुलकीचा वरवंटा ठेवून बसलेल्या अधिकारी मंडळींना कळकळीची विनंती.
Previous Article10 मोठय़ा कर्जधारकांमध्ये पाकिस्तान सामील
Next Article ब्रिटनमधून येणाऱ्यांना आता निर्बंध शिथिल
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.