वार्ताहर/ निपाणी
केंद्र व राज्य सरकारने अत्यावश्यक सेवा 112 या नंबरची वाहन योजना सुरू केली आहे. या अत्यावश्यक वाहनांची माहिती सर्वसामान्य कुटुंबापर्यंत पोहोचावी, या अनुषंगाने निपाणी बसवेश्वर स्थानकाच्या फौजदार अनिता राठोड यांनी पडलिहाळ येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर कॉलनीतील नागरिक व महिलांना माहिती दिली.
प्रारंभी गीता लोहार व अंकिता कांबळे यांच्या हस्ते फौजदार अनिता राठोड यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना फौजदार राठोड म्हणाल्या, कोणत्याही आपत्कालीन काळात मदत हवी असल्यास 112 या नंबरला फोन लावल्यास केवळ 10 ते 15 मिनिटांमध्ये तुम्हाला मदत मिळू शकते. यामध्ये एखाद्या ठिकाणी आग लागल्यास, अपघात झाल्यास किंवा महिला व युवतींची छेडछाड होत असल्याचे निदर्शनास आल्यास 112 या नंबरला फोन करावा. फोन केल्यानंतर संबंधित व्यक्तीला त्वरित मदत मिळू शकते, असे सांगितले.
कार्यक्रमास नवनिर्वाचित ग्रा. पं. सदस्य कुमार कांबळे, रविंद्र कांबळे, उदय कांबळे, ओमकार कांबळे, रोहन कांबळे, सतीश गोरे, अतुल शितोळे, अमित मुरलीधर, रोहित कांबळे, प्रमिल कांबळे, हेमंत मधाळे यांच्यासह नागरिक, महिला व निपाणी बसवेश्वर स्थानकातील पोलीस कर्मचारी उपस्थित होते. स्वागत रवी कांबळे तर प्रास्ताविक संजय कांबळे यांनी केले.