उदय मडकईकर यांची टीका, असंख्य समर्थकांसह काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रतिनिधी/ पणजी
पणजी मतदारसंघाच्या दुर्दशेला बाबूश मोन्सेरात हेच कारणीभूत असून एकतर त्यांनी पणजीच्या विकासासाठी स्वतः काही केले नाही आणि इतरांनाही काहीच करू दिले नाही. बाबूश हे ह्यबिच्युअल डिफेक्टर आहेत. त्यांनी राजकारणात घराणेशाही आणली आहे. मतदारांनी ही घराणेशाही संपवून त्यांना घरी बसविले पाहिजे, अशा शब्दात पणजीचे माजी महापौर तथा विद्यमान नगरसेवक उदय मडकईकर यांनी बाबूश मोन्सेरात यांच्यावर कठोर टीका केली.
पणजीत काँग्रेस भवनात आयोजित सोहळ्यात आपल्या असंख्य समर्थकांसह काँग्रेस प्रवेश केल्यानंतर ते बोलत होते. त्यावेळी व्यासपीठावर विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, पक्षाध्यक्ष गिरीश चोडणकर माजी मंत्री संगिता परब, नगरसेवक सुरेंद्र फुर्तादो, माजी नगरसेवक राहूल लोटलीकर, एल्विस गोम्स, टोनी रॉड्रिग्स, रुडाल्फ फर्नांडीस, विजय भिके, यांच्यासह अन्य नेत्यांची उपस्थिती होती.
काँग्रेसच्या उमेदवारीवर विजयी झालेल्या बाबूश यांनी मतदारांचा विश्वासघात करून अचानक भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे निवडणूक प्रचारावेळी त्यांनी मतदारांना दिलेल्या सर्व आश्वासनांचा त्यांना विसर पडला. 100 दिवसात पॅसिनो हटविण्याचे वचन थेट जाहिरनाम्यातच दिले होते. परंतु 50 दिवस सरतात न सरतात तोच त्यांनी भाजपात उडी मारली व आश्वासन हवेत विरले. त्याची पूर्तता आजपर्यंत झालेली नाही. बाबूश यांनी अशाप्रकारे मतदारांचा विश्वासघात केला असून मतदारांनीच त्यांना अद्दल घडवून घरी बसवावे, तसेच त्यांची घराणेशाहीही संपवावी, असे आवाहन मडकईकर यांनी केले.
श्री. चोडणकर यांनी बोलताना, संपूर्ण तिसवाडी म्हणजे स्वतःची जागीर असल्याच्या थाटात दावे, वक्तव्ये करून मोन्सेरात यांनी मतदारांच्या भावना दुखवल्या आहेत. ते मतदारांना गृहित धरत असून त्यांनी राजकारणात घराणेशाही चालविली आहे. स्वतःसह पत्नी आणि आता मुलालाही राजकारणात उतरवून थेट महापौरपदी बसविले आहे. परंतु त्यांच्या या घराणेशाहीला पणजीकर कंटाळले आहेत. म्हणुनच यंदाच्या निवडणुकीत पणजीसह ताळगावमधील मतदारही परिवर्तन घडवणार आहेत, असा विश्वास व्यक्त केला.