प्रतिनिधी/ पणजी
पणजी शहरातील विविध भागात गेल्या अनेक वर्षांपासून बेवारस स्थितीत पडलेली वाहने हटविण्याचे काम पणजी महानगरपालिकेने सुरू केले आहे. हटविण्यात आलेल्या या वाहनांचा लिलाव करण्यात येणार आहे.
याबाबत महापौर उदय मडकईकर यांनी दिलेल्या माहितीनुसार शहरात सुमारे 280 बेवारस वाहने गेल्या अनेक दिवसांपासून उभी आहेत. त्या वाहनांच्या मालकांना अनेकवेळा नोटीस देऊनही ती काढण्यात येत नव्हती. शेवटी सहा महिन्याची अखेरची नोटीस देऊन ती वाहने आता महानगरपालिकेने ताब्यात घेण्याची कारवाई सुरू केली आहे. यात 100 चारचाकी तर 180 दुचाकी वाहनांचा समावेश आहे. पणजीतील कांपाल मैदानावर ही वाहने ठेवण्यात येणार असून त्यानंतर जाहीर नोटीस देऊन त्या वाहनांचा लिलाव करण्यात येणार आहे, असे श्री. मडकईकर यांनी सांगितले. सध्या लॉकडाऊनमुळे शहरात वाहनांची वर्दळ कमी झाली आहे. त्यामुळे ही कामे करणे सोपे जात असल्याचे श्री. मडकईकर यांनी नमुद केले आहे. रविवारपर्यंत ती सर्व वाहने हटविण्यात येणार आहे. आता जरी कोणी वाहनाचा ताबा घेण्यासाठी किंवा दावा करण्यासाठी पुढे आला तरी त्याला ती वाहने दिली जाणार नाहीत. आता ती सर्व वाहने जप्त करण्यात येणार असून त्यावर आता पणजी मनपाची मालकी झाल्याचे महापौर म्हणाले. सदर वाहने हटविल्यानंतर शहरातील अनेक जागा रिकाम्या होणार असून तेथे वाहनांच्या पार्किंगसाठी जागा मिळणार आहे. शिवाय शहर अधिक स्वच्छ दिसणार आहे. जप्त करण्यात आलेल्या वाहनांच्या लिलावातून मिळणारी रक्कम मनपाच्या तिरोजीत जमा होणार असल्याचे महापौरांनी सांगितले. मनपाच्या या निर्णयाचे नागरिकांनी स्वागत केले आहे.