कर्फ्यूचा दुसरा दिवस, मार्केट परिसराला पोलिसांचा वेढा, फळ विक्रेत्यांना फटका
प्रतिनिधी / पणजी
कर्फ्युचा दुसरा दिवस ! आणि राजधानी पणजी शहरात जवळपास सर्वत्र सन्नाटाच दिसून आला. दररोज गजबजणारे बांदोडकर रस्ता, 18 जून रस्ता, महात्मा गांधी रस्ता आणि डॉ. आत्माराम बोरकर हे सर्व रस्ते ओस पडलेले. पणजी मार्केट प्रकल्पाला चारही बाजूनी पोलिसी वेढा पडल्याने कोणी तिथे फिरकत देखील नाही.
राजधानी पणजी शहरात सर्वत्र कडक कर्फ्यू लागू झालेला दिसून येतो. सकाळच्यावेळी काही भुसारी दुकाने उघडली जातात. पणजी मार्केट परिसरातील सर्वच दुकाने बंद आहेत. पोलिसांनी मार्केट समोरून थेट कांपालला बांदोडकर रस्त्याला जोडला गेलेला संपूर्ण रस्ता दोन्ही बाजूनी सील करून तेथील वाहतूक देखील बंद केलेली आहे. समोरून दोन्ही बाजूने व मार्केटच्या मागील परिसरात पोलिसी बंदोबस्त वाढविलेला आहे. मार्केट मधील फळ विक्रेते तसेच भाजी विक्रेत्यांनी आपल्याकडे शिल्लक असलेला माल काढून हॉटेल चालकांना देऊन टाकला. कर्फ्यूमुळे खरा फटका बसला तो फळ विक्रेत्यांना
कोविड रुग्णांना कित्येक डॉक्टरर्स फळे खावा, असे सांगतात, परंतु सध्या पणजी मार्केटला सील ठोकल्याने कोणालाही काही खरेदी करता येत नाही. दि. 24 मे पर्यंत राज्यात कर्फ्यू लागूच रहाणार आहे. कोरोनाची लाट जी सर्वत्र पसरलेली आहे, त्याची साखळी तोडण्याचा जनतेचाही प्रयत्न रहणार आहे. राजधानी पणजीत सध्या दुपारी 1 वा. पासून कडकडीत हरताळ पाळला जात आहे. केवळ भुसारी दुकाने तेवढीच खुली ठेवण्यात आलेली आहेत. त्यांच्यासमोर स. 7 ते पासून ग्राहकांच्या रांगा सुरू होतात. भाजी विक्रेत्या बऱयाच जणांनी आपापली दुकानेच बंद करून टाकलेली आहेत.
नेहमीच गर्दी उसळून पडणारी पणजीतील अनेक हॉटेलांसमोर स्मशानशांतता दृष्टीस पडते. पणजी मार्केट परिसरात सकाळच्या प्रहरी काही जण खेळताना दृष्टीस पडले. मात्र पोलीस येताच त्यांनी धूम ठोकली.
गोमंतकीय विक्रेत्यांना हवी जागा
सध्या काही डॉक्टरर्स रुग्णांना फळे खा असा सल्ला देतात खरे ! परंतु पणजीतील बहुतांश फळविक्रेत्यांनी आपापली दुकाने बंद केलीत. सध्या फळांची विक्री देखील परवडत नाही, असे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. शिवाय महाराष्ट्र व कर्नाटकातून फळे येणे जवळपास बंदच पडलेले आहे. ऐन दुपारी तहान लागली म्हणून लिंबू सोडा घेणार तर बसायला जागा नाही, लिंबू सोडा विक्रेत्यांनी आपापली दुकाने धाडधाड बंद करून टाकलीत. त्यामुळे भर दुपारी पणजीत फिराल तर अवघीच 2 ते 4 अशी दुकाने दिसतील. ज्यामध्ये सोडा वॉटर, किंवा पाण्याच्या बाटल्या दुपार 1 पर्यंतच विक्रीस असलेल्या दृष्टीस पडतात.
मिरामार परिसर सुनासुना
मे महित्याचे दिवस ! असून देखील मिरामार समुद्र किनारा सध्या सुनासुना दिसून येतो. पर्यटक जवळपास बंदच झालेत. गोमंतकीय वार्षिक 4 दिवस खाऱया पाण्याच्या आंघोळीसाठी गर्दी करून असतात. यावर्षी कर्फ्यू लागू केल्याने मिरामार समुद्र किनारी जाण्यासच दिले जात नाही. सध्या राज्यातील सर्व समुद्र किनाऱयांना पोलिसांनी विळखा घातलेला असल्याने राज्यातील समुद्र किनारे निर्मनुष्य बनले आहेत. गोव्यात प्रसिद्ध किनारा मिरामार पासून राजभवन पर्यंत च्या साऱया परिसरात सध्या कोणीही फिरकलेला दृष्टीस पडत नाही.
कर्फ्यू लागू झाल्याने साऱया पणजीत शुकशुकाट दिसून येतो. सरकारी कार्यालयात 50 टक्के पेक्षा कमी प्रमाणात कर्मचारी वर्गाची उपस्थिती असल्याने रस्त्यावरील वाहनांची वर्दळ अत्यल्प झाली आहे. कदंबच्या बसेस फारच कमी प्रमाणात रस्त्यावरून धावत आहेत तर काही अवघ्याच मार्गावर खासगी बसेस आहेत. मात्र कामावर येणाऱया सरकारी कर्मचाऱयांचे हाल झालेत, जे दररोज बसवरून कामाला येतात, त्यांची सध्या धांदल उडालेली आहे.
राजधानी पणजी शहरात सकाळी थोडीफार वाहनांची अधूनमधून वर्दळ दृष्टीस येते. दुपार पर्यंत सर्वत्र पुन्हा शुकशुकाट दिसून येतो. सध्या आंब्याचे दिवस असल्याने गोव्यातील पारंपरिक शेतकरी मिळेत तेथे विशेषतः पणजी मार्केटच्या बाहेरच्या परिसरात आंबे, अननसे तसेच स्थानिक विविध फळे व भाजीची विक्री करायची, ऐन हंगामात त्यांना आता फळांची व भाजांची विक्री करता येत नसल्याने आर्थिक फटका बसला. पणजी मनपाने मार्केटचा सारा परिसर दि. 24 मे पर्यंत सील केलेला असल्याने मार्केट पूर्वपदावर येण्यास आणखी तीन आठवडे लागतील.