अवघ्या काही मतांनी पराभूत : मताधिक्य घटल्याने बाबूश मोन्सेरात नाराज
प्रतिनिधी /पणजी
राजधानी पणजी मतदारसंघातून भाजपचे उमेदवार बाबुश मोन्सेरात हे जरी विधानसभा निवडणुकीत जिंकले असले तरी खरी मते मात्र अपक्ष उमेदवार व स्व. मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांनी घेतल्याचे निकालातून समोर आले आहे. मागील दोन – तीन निवडणुकीत हजारो मतांचे मताधिक्य मिळवून विजयी होणाऱया मोन्सेरात यांचे मताधिक्य केवळ 716 एवढी कमी झाल्याचे दिसून आले. पर्रीकर यांनी अत्यंत कमी वेळात मोन्सेरात या कसलेल्या राजकारण्याशी निकराची झुंज दिली असल्याचे एकंदरित मतांवरुन स्पष्ट होते.
मोन्सेरात यांना 6787 एवढी मते मिळाली तर पर्रीकर यांनी 6071 मते घेतली. म्हणजे पर्रीकर यांनी मोन्सेरात प्रमाणे 6 हजार मतांचा टप्पा पार केला पण कुठेतरी किरकोळ अशा 716 मतांनी त्यांना हार खावी लागली. पर्रीकर यांच्या आकडेवारीने पराभव झाला असला तरी मोन्सेरात यांचा दणकेबाज विजय झाला असे म्हणता येणार नाही. त्यांचा हा विजय काठावरचा असून पर्रीकरांचा पराभवही काठावरचा म्हणावा लागेल. काँग्रेसचे उमेदवार एल्विस गोम्स यांनी 3175 मते काढली आणि ते तिसऱया स्थानावर राहिले. ते जर रिंगणात नसते आणि काँग्रेसने जर पर्रीकर यांना पाठिंबा दिला असता तर मात्र पर्रीकर विजयी ठरले असते आणि मोन्सेरात यांना पराभवाचा झटका बसला असता. मतविभागणीचा फटका पर्रीकरांना बसल्याचे आता त्यांचेच कार्यकर्ते सांगत आहेत. या विजयामुळे बाबुश मोन्सेरात खूश नाहीत तर नाखूश आहेत. भाजपने अर्थात कार्यकर्ते पदाधिकारी यांनी आपल्यासाठी कामच केले नाही म्हणून मताधिक्य घटल्याचा दावा मोन्सेरात यांनी केला आहे. त्यांनी पर्रीकरांसाठी काम केले व आपण आपल्या हिंमतीवर मते मिळवली असा अर्थ त्यांनी काढल्याचे समोर आले आहे.