महापौर उदय मडकईकर यांची माहिती
प्रतिनिधी / पणजी
पावसात राजधानीतील रस्ते पाण्याखाली जाऊ नये तसेच पाणी साचू नये यासाठी मनपातर्फे विविध उपाययोजना आखल्या जात आहेत. सध्या मळा पणजी येथील रस्त्याच्या बाजूच्या गटारांची साफसफाई मनपा सफाई कामगारांतर्फे केली जात आहे. परंतु गटारांमध्ये केबल्स असल्यामुळे त्यातील गाळ, कचरा काढण्यात कामगारांना डोकेदुखी होत आहे.
दरवर्षी पावसाळय़ात पणजीमध्ये विविध ठिकाणी पाणी साचते. गटारामध्येही विविध कंपनी, एजन्सीच्या केबल्स असल्यामुळे गटारातून पाणी जायला कठीण होते. त्यामुळे या केबल्स काढून गटारातून पाण्याचा निचरा कसा होईल याबाबत उपाययोजना पणजी महानगरपालिकातर्फे काढण्यात येत आहेत. सध्या मळा येथील पूलाजवळील गटाराची साफसफाई व पाण्याच्या निचऱयाचे काम मनपातर्फे घेण्यात आले आहे. भर पावसात महापौर उदय मडकईकर यांनी कामगारांसमवेत मळा पूलजवळील गटारांची व आसपासच्या गटारांची पाहणी केली.
मळा येथे यापूर्वी कधीच पाणी साचले नाही. गटारामध्ये केबल्स असल्यामुळे पाणी साचले आहे. मळा पूल जवळील गटारामध्ये केबल्स घातले असून पाणी साचण्यास कारणीभूत ठरत आहेत. ज्या ज्या कंपन्यांचे केबल्स आहेत त्या कंपन्यांना केबल्स काढण्यासाठी बोलविण्यात आले असून जर लवकरात लवकर केबल्स काढले गेले नाहीत तर ते केबल्स गटारातून तोडण्यात येतील असा इशारा महापौर उदय मडकईकर यांनी दिला. गटारात केबल्स घालणे चुकीचे आहे. केबल्समुळे पाणी साचले आहे. संपूर्ण राजधानीतील रस्त्याच्याजवळील गटारात केबल्स घालण्यात आले आहेत आणि हे केबल्स पाणी जाण्यासाठी अडथळा निर्माण करत आहेत असे मडकईकर यांनी सांगितले.