कडक पालन करण्याचे महापौरांचे आवाहन
प्रतिनिधी /पणजी
पणजी महापालिकेने गणेशचतुर्थीसाठी एसओपी (मार्गदर्शक प्रणाली) जाहीर केली असून कोरोनाला रोखण्यासाठी तिचे पालन करावे असे आवाहन महापौर रोहीत मोन्सेरात आणि उपमहापौर वसंत आगशीकर यांनी केले आहे. चतुर्थी साजरी करताना सर्वांनी सामाजिक अंतर पाळून मास्क घालावेत आणि गर्दी टाळावी, असेही ते म्हणाले.
पणजीत झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले की, गणपती आणताना व विसर्जनासाठी नेताना वाहनासोबत दोनच माणसे ठेवावीत, प्लॅस्टर ऑफ पॅरीसचे गणपती नकोत आणि फटाके जास्त लावू नयेत. त्यावरही मर्यादा ठेवा असेही त्यांनी सूचवले आहे.
फटाक्यांसाठी ज्यांना अनुमती देण्यात आली आहे त्यांनीच ते रॉयल फूड समोर घालावेत. इतरांनी कोणी फटाके स्टॉल लावू नयेत. पणजी महापालिका क्षेत्रात विविध ठिकाणी गणेश विसर्जन करण्यात येते. तेथे लोकांनी गर्दी करु नये व ती टाळावी. सायंकाळी 5 ते रात्री 10 पर्यंत विविध वेळेला विसर्जन करावे. एकाचवेळी सर्वांनी गर्दी करु नये, असेही त्यांनी बजावले आहे.
प्रदूषण टाळण्यासाठी फटाक्यांचा वापर कमीत कमी करावा असेही ते म्हणाले. सार्वजनिक गणपतीसाठी 50 टक्के क्षमतेने लोक असावेत आणि जास्तीत जास्त 100 लोकांना मंडपात अनुमती देण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले. फटाके व इतर सर्व दुकानांना रात्री 8 पर्यंत खुले राहाण्यास परवानगी आहे. या एसओपीसाठी पणजीतील जनतेने सहकार्य करावे. काळजी घ्यावी आणि सुरक्षित राहावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.