लॉकडाऊनमुळे व्यवसाय बंद : विविध प्रकारचे उत्पन्न बुडाले
प्रतिनिधी / पणजी
राज्यातील अनेक आस्थापने, उद्योग, व्यवसाय यांना कोरोनाचा मोठा फटका बसला आहे. पणजी महानगरपालिकाही यातून सुटलेली नाही. कोरोना महामारीमुळे अनेक व्यवसाय बंद झाले आहेत. तारांकित हॉटेलांचा व्यवसाय बुडाला आहे. त्याचा परिणाम मनपाच्या आर्थिक उत्पन्नावर झाला आहे. दर महिन्याला मनपाला 30 लाखापेक्षा जास्त महसुलाला मुकावे लागले आहे. त्यामुळे मनपासमोर मोठे आर्थिक संकट निर्माण झाले आहे.
कोरोनामुळे पणजीत मोठमोठी दुकाने भाडय़ाने घेऊन व्यवसाय करणाऱया व्यावसायिकांनी दुकाने, शोरुम, बंद केले आहेत. या दुकानदारांकडून व्यापार परवाना नूतनीकरणाच्या माध्यमातून व घरपट्टीच्या रुपाने मनपाला दर महिन्याला 30 ते 40 लाख रुपयांचा महसूल प्राप्त व्हायचा, मात्र व्यावसायिकांनी दुकाने बंद केल्याने मनपाचा हा महसूल बुडाला आहे. पणजीतील अनेक मोठी दुकाने, व्यवसाय बुडाल्याने बंद केली आहेत. भाडय़ाची रक्कम मोठी असल्याने व भाडे भरणे शक्य होत नसल्याने अनेकांनी करार रद्द करून दुकाने सोडली आहेत. पणजीतील मार्केटसह विविध भागातील दुकाने बंद झाली आहेत. त्यामुळे महिना पाच ते सात लाखांचाच महसूल मनपाला मिळत आहे.
तारांकित हॉटेल व्यवसाय ठप्प
मर्यादा घालून हॉटेल व्यवसाय सुरू करण्यास सरकारने परवानगी दिली असली तरी अद्याप राज्यातील रेस्टॉरंट खुले झालेले नाहीत. तारांकित हॉटेल्स सुरू झाली नाहीत. त्यामुळे हॉटेल व्यवसायातून मिळणारा महसूलही बंद झाला आहे. पर्यटक नसल्याने त्याचबरोबर स्थानिक लोकही हॉटेलमध्ये जायला तयार नसल्याने हॉटेल व्यावसायिकांनीही व्यवसाय बंद ठेवला आहे. घरपट्टीतूनही मनपाला चांगला महसूल मिळत होता, मात्र तुर्तास लोकांनाही अर्थिक टंचाईची झळ बसल्याने घरपट्टी भरणाही मंदावला आहे.
आर्थिक टंचाईमुळे नवीन प्रकल्प नाही
मनपाचे आर्थिक स्रोत मंदावल्याने मनपाने नवीन प्रकल्पांची कामे न घेण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील तीन महिने कोणतेही नवीन प्रकल्प हाती घ्यायचे नाही असा निर्णय घेण्यात आला आहे. ज्या कामांना अगोदर मंजुरी दिली होती, त्याच कामांसंदर्भात विचार केला जाणार आहे.
अडिच कोटी रुपये पगाराचा खर्च
मनपा कर्मचारी आणि कंत्राटी कामगार यांच्या पगारावर मनपाला महिना अडिच कोटी रुपयांचा खर्च आहे. उत्पन्न कमी आले म्हणून पगारात कपात करता येत नाही. त्यामुळे खर्चाचे प्रमाण तसेच आहे. मनपाने सध्या आवश्यक खर्चाला कात्री लावली आहे. आवश्यक असेल तेवढाच खर्च करायचा असा निर्णय मनपाने घेतला आहे.
मनपा आर्थिक संकटाचा सामना करतेय ः मडकईकर
पणजी महापालिका सध्या आर्थिक संकटाचा सामना करीत आहे. कोरोनामुळे व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. व्यावसायिकांकडून विविध स्वरुपामध्ये मिळणाऱया करातून मनपाचा कारभार चालतो, पण क्यवसाय बंद झाल्याने मनपाच्या महसूली उत्पन्नाला मोठा फटका बसला आहे, असे महापौर उदय मडकईकर यांनी सांगितले. राज्यातील सर्वच पालिकांना फटका बसला आहे. आर्थिक उत्पन्न कमी झाले तरी खर्च कमी होत नाही. तूर्त अनावश्यक कोणताही खर्च मनपा करत नाही. त्याचबरोबर नवीन प्रकल्पही हाती घेत नाही, असेही मडकईकर यांनी सांगितले.