प्रतिनिधी / काणकोण
काणकोणात 6 रोजी मध्यरात्री पडलेल्या मुसळधार पावसामुळे तळपण आणि गालजीबाग नद्यांना पूर आलेला असून दोन्ही नद्यांच्या पाण्याची पातळी मोठय़ा प्रमाणात वाढली आहे. अकस्मात वाढलेल्या या पाण्यामुळे खोतीगाव पंचायतीमधील नदीच्या काठावरील शेतीमध्ये पाणी घुसून भातशेतीचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झालेले आहे. नदीच्या काठावरील पणसुलेमळ येथील आनंदू वेळीप यांच्या भातशेतीजवळ मोठे भगदाड पडले असून पेरणी केलेली अर्ध्यापेक्षा अधिक शेती वाहून गेली आहे, तर काही ठिकाणी माती येऊन पडली असल्याची माहिती वेळीप यांनी दिली. यासंबंधीची कल्पना स्थानिक मामलेदार कार्यालयाला देण्यात आलेली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.