कलम 144 आणि आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे भलतेच खुळ ‘पतंगे’ साहेबांच्या डोक्यात
सातारा / प्रतिनिधी :
सध्या कोरोनामुळे असलेल्या लॉकडाऊनमुळे पोलिसांना अधिकार दिले असले, तरीही त्या अधिकाराचा गैरवापर करणे चुकीचे आहे. शाहुपूरी पोलीस ठाण्याचे कारभारी जरा हवेतच आहेत. पतंगेंची दादागिरी वाढली असून, सर्वसामान्यांवर रुबाब गाजवत आहेत. त्यामुळे सामान्य माणसांच्या मनात पोलिसांबद्दल चिड येवू लागली आहे.
लॉकडाऊनबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी नियम तयार केले. पालकमंत्र्यांनी आणि राज्याचे गृहमंत्र्यांनी आदेश दिले म्हणून जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई करत आहे. परंतु सातारा शहरात शाहुपूरी पोलीस ठाण्याचे कारभारी संजय पतंगे यांचा जरा जास्तच उतमात सुरु आहे. ते पोलिसातील भाई बनू लागले आहेत. कायद्याच्या आडून सर्वसामान्यांच्यावर दादागिरी करत लाठीकाठीचा विनाकारण प्रसाद माहिती न घेता देत आहेत. जरी महत्वाच्या कामानिमित्ताने बाहेर पडलेल्यांनाही त्याचा फटका बसत आहे. त्यांच्याकडून दडपशाही, जुलूमशाही सुरु असून नागरिकांबाबत शाहुपूरी पोलिसांच्याबाबत तीव्र चीड निर्माण होवू लागली आहे.
शेतकरी हा सगळ्यांचा तारणहार आहे. शेतकऱ्यांना सध्या पेरणीकरता खतेबियाणे लागतात. ती खरेदी करण्यासाठी व नेण्यासाठी सातारा तालुक्यातील शेतकरी पोलिसांच्या भितीने साताऱ्यात येतच नाहीत. आले तर त्यांना बियाण्यासाठी खताच्या दुकानात द्यायचे पैसे पोलिसांच्या दंडाला द्यावे लागत आहेत. दुकानापर्यंत पोहचले अन् दुकानाच्या दारात उभे राहिले तरीही अडचण. तेथेही पोलीस आहेत. कोरोनाची भिती प्रत्येकाला आहे. परंतु कोरोनापेक्षा पोलिसांचीच भिती सर्वसामान्यांच्या मनात मोठी आहे. त्यातल्या त्यात शाहुपूरी पोलीस ठाण्याचे संजय पतंगे यांची मोठी दहशत निर्माण झाली आहे. त्यांनी गेल्या चार दिवसांपूर्वी महिलांनाच चक्क काठीचा प्रसाद देवून गाडीत बसायला भाग पाडले. त्या महिला कशाला आल्या होत्या, तेही जाणून घेतले नाही. तसाच प्रकार खत विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांना थेट आरेतुरे करत अक्कल काढत दमदाटीची भाषा करत कायदेशीर कारवाईची धमकी पतंगे साहेबांनी दिल्याचे सातारकरांनी पाहिले. त्यामुळे शेतकरांप्रती किती कळवळा शाहुपूरी पोलिसांना आहे, याचीच तीव्र शब्दात नाराजी व्यक्त होत आहे.
मांजरे साहेबांचा आदर्श घ्या
पतंगे साहेब खरोखरच तुम्ही कायद्याच्या नावाखाली विनाकारण नागरिकांना त्रास देवू नका. सध्या शेतकऱ्यांच्या खरीप हंगाम आहे. या हंगामात शेतकरी खते, बियाणे न्यायया येणार. परंतु तुम्ही जर त्या शेतकऱ्यांवर व खते बियाण्यांची विक्री करणाऱ्यांवर जर कारवाई करणार असाल तर हे राज्य सरकार किती शेतकऱ्यांच्या हिताचे आहे हेही यावरुन स्पष्ट होते. त्यातल्या त्यात किमान शेजारच्या पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांचा तरी तुम्ही आदर्श घ्या, असा सुर व्यापाऱ्यांमधून उमटू लागला आहे. त्यांच्या दडपशाही विरोधात जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.