पती आणि पत्नी यांचे नाते साताजन्मांचे असते. अशी आपली भावना आहे. तथापि क्रूर कोरोनाला ही भावना समजत नाही. त्यामुळे तो कोणावरही घाला घालतो. झारखंडमध्ये बोकारोतील जैनामोड येथे अशाच प्रकारचे एक हृदयस्पर्शी घटना घडली आहे. जी पंचक्रोशीत चर्चेचा विषय बनली आहे. पत्नीवर पतीचे किती प्रेम असू शकते याचे ही घटना म्हणजे एक प्रत्यंतर आहे.
बोकारो येथे 65 वर्षीय कांता खेतान यांचे कोरोनामुळे निधन झाले. त्यावेळी त्यांचे पती त्यांच्यासमवेत नव्हते. साबरमल खेतान हे त्यांचे पती असून त्यांचे वय 70 वर्षांचे होते. पत्नीच्या निधनाची वार्ता कळताच ते घरी आले. पत्नीच्या मृतदेहासमवेत स्मशानभूमीत गेले. तेथे चिता रचण्यात आली होती. प्रथेनुसार त्यांनी मृत पत्नीच्या कपाळावर कुंकु लावले. आणि त्याचक्षणी त्यांचे स्वतःचे प्राणोत्क्रमन झाले. त्यांचे पत्नीवर निरतीशय प्रेम होते. पत्नीशिवाय आपले जीवन व्यर्थ आहे असे ते नेहमी त्यांच्या मित्रांसमोर म्हणत असत. पत्नीचा मृत्यू झाल्याची घटना त्यांच्यासाठी अति धक्कादायक होती. तथापि पत्नीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार होण्याआधीच स्मशानभूमीतच त्यांचा मृत्यू होईल, अशी कल्पना देखील कोणाला करता आली नव्हती. पण पत्नीशिवाय जीवन व्यथित करणे आपल्याला अशक्य आहे. हे त्यांच्या मनाने घेतले होते. त्यामुळे पत्नीच्या चितेला अग्नी देण्याआधीच त्यांनीही या जगाचा निरोप घेतला. ही घटना पती पत्नीच्या उत्कट प्रेमाची साक्ष म्हणून लक्षात राहिल, असे त्यांच्या गावातील लोक बोलत आहेत.