पत्नीच्या गावी करतोय जाळपोळ , थेट मुख्यमंत्र्यांकडे पत्नीची तक्रार
मध्यप्रदेशच्या राजगढ जिल्हय़ातील देवली गावातील एका महिलेने मुख्यमंत्री शिवराज सिंग यांना सुरक्षा देण्याची विनंती करत स्वतःच्या पतीपासून वाचविण्याची मागणी करणारे पत्र लिहिले आहे. पतीच्या छळाला वैतागून माहेरी आलेल्या कालीबाईला परत नेण्यासाठी पती दबाव आणतोय. पत्नी सासरी परतत नसल्याने पती ज्ञानसिंग देवली गावात जाळपोळ करण्यासह ग्रामस्थांना नुकसान पोहोचवत आहे. तर ग्रामस्थांनी महिलेच्या वडिलांना नुकसानीची भरपाई करण्यास सांगितले आहे.
तेथील ग्रामीण भागात आजही ‘झगडा’ प्रथा आहे. यात झगडा न देण्यावर पत्नीच्या गावातील लोकांना नुकसान पोहोचविले जाते आणि महिलेच्या वडिलांना नुकसानची भरपाई करावी लागते.
काली बाईचा 4 वर्षांपूर्वी ज्ञान सिंग याच्यासोबत विवाह झाला होता. पण हुंडय़ासाठी तिला मारहाण केली जात होती. छळाला कंटाळून कालीबाई माहेरी परतली होती. सासरी परतण्यास नकार मिळाल्याने ज्ञानसिंगने ‘झगडय़ा’वरून रकमेची मागणी केली होती. पण आर्थिक स्थिती चांगली नसल्याने ही मागणी पूर्ण करणे महिलेच्या वडिलांना शक्य झाले नाही. यामुळे ज्ञानसिंगने गावातील शेतांमध्ये नासधूस करत जाळपोळ केली आहे.