स्व. बाबुराव ठाकुर यांना सांगलीत अभिवादन
प्रतिनिधी / सांगली
पत्रकारांच्यामध्ये समाजाचा चेहरा आणि शासनाचे निर्णय बदलण्याची ताकद असते. फक्त पत्रकारांना आपली क्षमता ओळखता आली पाहिजे. सामाजिक बांधिलकी जपून पत्रकारिता केल्यास समाज सढळ हाताने मदत करता, असे प्रतिपादन जेष्ठ पत्रकार तथा सहकार तपस्वी बापूसाहेब पुजारी यांनी आज येथे बोलताना केले. स्व. बाबुराव ठाकुर यांनी समाजहित जपले, त्यामुळेच तरूण भारतचा आज वटवृक्ष झाला आहे, असे गौरवोद्गारही त्यांनी यावेळी बोलताना काढले.
तरुण भारतचे संस्थापक, संपादक आणि सीमा लढ्याचे प्रणेते स्व. बाबुराव ठाकुर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन प्रसंगी पुजारी बोलत होते. यावेळी संपादक मंगेश मंत्री उपस्थित होते. पुढे बोलताना पुजारी म्हणाले, स्व. बाबुराव ठाकुर यांनी सीमा लढ्याचे नेतृत्व केले. शिक्षण अर्धवट सोडून सीमा लढ्यात उडी घेतली. समाजहित डोळ्यासमोर ठेवून तरुण भारत ची स्थापना केली. शाळा सुरू केल्या. बाबुराव ठाकुर यांच्या समाजाप्रती असलेल्या तळमळीमुळे ‘तरुण भारत’चा वटवृक्ष झाला आहे, असे गौरवोद्गार पुजारी यांनी काढले.
स्व. बाबुराव ठाकुर यांच्या आठवणींना उजाळा देत पुजारी म्हणाले, विजापुरहून सीमा वासीयांचा मोठा मोर्चा निघाला होता. बाबुराव ठाकुर यांनी सांगलीत या मोर्चाचे स्वागत केले होते. त्यांना आणण्यासाठी दुचाकीवरून बेळगावला गेलो होतो. ठाकुरही तात्काळ आले, अशी आठवण सांगत पुजारी म्हणाले, पत्रकारांमध्ये समाजाचा चेहरा बदलण्याची ताकद असते. स्व. ठाकुर यांनी सुरू केलेली समाजभिमुख परंपरा तरुण भारतने कायम टिकवावी. कार्यक्रमाच्या सुरवातीस स्व. बाबुराव ठाकुर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. स्वागत मंगेश मंत्री यांनी केले. तर आभार मुख्य प्रतिनिधी संजय गायकवाड यांनी मानले. कार्यक्रमास तरुण भारत जाहिरात व्यवस्थापक संजीव डाळिंबकर, मुख्य उपसंपादक अवधूत जोशी, वितरण व्यवस्थापक अनुप पुरोहित, संगणक विभाग प्रमुख गजानन घाडगे, व्यवस्थापक राहुल गोखले यांच्यासह तरुण भारत परिवारातील सदस्य यावेळी उपस्थित होते.