ऑनलाईन टीम/तरुण भारत
सत्ताधारी पक्षाकडून सतत अपमान होत असल्याचा आरोप करीत तेलुगू देसम पक्षाचे (टीडीपी) प्रमुख तसेच विरोधी पक्षनेते चंद्राबाबू नायडू यांनी पुन्हा सत्तेवर येत नाही तोपर्यंत विधानसभेत पाऊल टाकणार नाही असा निर्धार बोलून दाखविला. सभागृहात शनिवारी नायडू यांच्या भाषणात सत्ताधारी वायएसआर काँग्रेसच्या सदस्यांनी व्यत्यय आणला. चंद्राबाबू म्हणाले की, गेली अडीच वर्षे मी अपमान सोसत आहे, पण मी शांत राहिलो आहे. आज त्यांनी माझ्या पत्नीला सुद्धा लक्ष्य केले. मी नेहमीच सन्मानाने आणि सन्मानासाठी जगलो आहे. यापुढे मात्र मी अपमान पचवू शकणार नाही. सत्ताधारी सदस्य मला सतत कलंकित करीत आहेत. त्यामुळे मला यातना होत आहेत, असं म्हणत असताना चंद्राबाबू यांना अश्रू अनावर झाले.
पत्रकार परिषदेत आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि टीडीपी प्रमुख चंद्राबाबू भावूक झाले आणि ढसाढसा रडू लागले. वैयक्तिक हल्ल्यांमुळे चंद्राबाबू नायडू दुखावल्याचे सांगण्यात येत आहे. नायडू यांनी विधानसभेची तुलना ‘कौरव सभे’शी केली आणि वायएसआरसीपीचे मंत्री आणि आमदारांच्या ‘चरित्र हननाचा’ निषेध करण्यासाठी २०२४ पर्यंत बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला, असे टीडीपीने एका पत्रकाद्वारे म्हटले आहे.
तसेच चंद्राबाबू यांनी हिवाळी अधिवेशनात महिला सक्षमीकरणावर चर्चा सुरू होती. यावेळी सत्ताधारी वायएसआर काँग्रेसच्या नेत्यांनी नायडू आणि त्यांच्या पत्नीबाबत अपशब्द वापरले. त्यावर नायडू यांनी नाराजी व्यक्त केली. गेल्या अडिच वर्षापासून मी हा अपमान सहन करत आहे. आज तर त्यांनी माझ्या पत्नीलाच त्यांनी टार्गेट केलं आहे. मी नेहमीच सन्मानासाठी आणि सन्मानाने राहिलो. मात्र, आता मी अधिक सहन करू शकत नाही, असं ते म्हणाले. सत्ताधाऱ्यांनी माझ्या पत्नीवर निशाणा साधला आहे. मी माझ्या कुटुंबाचं चारित्र्य हनन सहन करू शकत नाही, असंही ते म्हणाले. नायडूंची पत्नी एनटी रामाराव यांची मुलगी आहे. एनटी रामाराव यांनी टीडीपीची स्थापना केली होती. ते दोनदा सत्तेत आले होते, असं म्हटलं आहे.