प्रतिनिधी /बेळगाव
शहराच्या काही भागात डेकोरेटिव्ह पथदीप बसविण्यात आले आहेत. मात्र हे पथदीप रात्रीच्या वेळी बंद असल्याने सर्वत्र अंधाराचे साम्राज्य पसरलेले पाहायला मिळत आहे. येथील आझाद गल्लीत ही समस्या उद्भवली असून नागरिकांना रात्रीच्या वेळी नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे पथदीप असूनसुद्धा त्याचा उपयोग होत नसल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे. या ठिकाणी अनेक गैरकृत्ये वाढल्याने नागरिकांची डोकेदुखी वाढली आहे.
आझाद गल्लीतील एकही पथदीप सुरू नसल्याने नागरिकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. या भागात क्यावसायिक दुकाने आहेत. त्यामुळे नागरिकांची खरेदीसाठी गर्दी दिसून येते. मात्र, पांगुळ गल्ली कॉर्नर ते माळी गल्ली येथील पथदीप बंद असल्याने वाहनधारकांना या मार्गावरून जाताना हेडलाईटचा आधार घ्यावा लागत आहे.
येथील सर्व दुकाने बंद झाल्यावर अंधाराचा फायदा घेत अनेक गैरप्रकार घडत आहेत. गेल्या कित्येक दिवसांपासून ही समस्या जैसे थे असून येथील पथदिपांच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष केल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे. पथदिपांची लवकरात लवकरात दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.