- नापास विद्यार्थ्यांची परीक्षा एका महिन्यात घेणार
ऑनलाईन टीम / मुंबई :
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रखडलेल्या अंतिम वर्षाच्या परीक्षांचे निकाल 10 ऑक्टोबरपासून लागायला सुरुवात होईल. तसेच या विद्यार्थ्यांच्या पदवी प्रमाणपत्रावर कोविडचा शेरा दिला जाणार नाही आणि या परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा एका महिन्यात घेतली जाईल, अशी माहिती महाराष्ट्र राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी शनिवारी दिली.
ते म्हणाले, अंतिम वर्षातील 1 लाख 16 हजार 400 विद्यार्थ्यांपैकी जवळजवळ 90 ते 92 टक्के विद्यार्थी ऑनलाईन परीक्षा देतील अशी नोंद विद्यापीठाकडे झाली आहे. तर उरलेले 10 टक्के विद्यार्थी हे स्वत: जवळच्या केंद्रात ऑफलाईन पद्धतीने परीक्षा देण्यासाठी तयार आहेत.
तसेच या पदवीच्या प्रमाणपत्रांवर कोविड 19 असा कोणत्याही प्रकारचा शेरा दिला जाणार नाही. हे पदवीचे प्रमाणपत्र हे गेल्यावर्षीप्रमाणेच दिले जाईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. पदवी प्रमाण पत्राचा आदर पूर्वी प्रमाणेच केला जाईल आणि असे झाले नाही तर संबंधितांवर कारवाई केली जाईल. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आनंददायी वातावरणात परीक्षा द्यावी, असे आवाहनही उदय सामंत यांनी यावेळी केले आहे.