वार्ताहर/ घटप्रभा
येथील मल्लापूर-पीजी सरकारी पदवीपूर्व सायन्स कॉलेज सुरु करावे, अशी अनेक वर्षांपासून मागणी आहे. मात्र सदर मागणीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येत आहे. सदर मागणीची पूर्तता 15 ऑगस्टपर्यंत न झाल्यास आंदोलन छेडू, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते बसवराज डी. हुद्दार यांनी पत्रकार परिषदेत दिला.
मल्लापूर-पीजी येथील शाळा आवारात सरकारी पदवीपूर्व सायन्स कॉलेज सुरु करण्यासाठी गत अनेक वर्षांपासून शिक्षणाधिकारी, जिल्हाधिकारी, आमदार, खासदार, मंत्री महोदयांकडे निवेदनाच्या माध्यमातून पाठपुरावा करण्यात आला. असे असतानाही याकडे संबंधितांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे.
मल्लापूर-पीजीसह परिसरातील 6 गावांमधील विद्यार्थ्यांना 12 वी नंतरच्या शिक्षणासाठी विशेषतः सायन्स कॉलेजसाठी सदर ठिकाण मद्यवर्ती आहे. याठिकाणी पदवीपूर्व कॉलेज निर्माण झाल्यास परिसरातील सुमारे 1200 विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार आहे. वेळ आणि पैशाची बचतही होताना पालकांना साहाय्य होणार आहे. मल्लापूर-पीजी, धुपदाळ, पामलदिनी, राजापूर, घटप्रभा, बडिगवाड परिसरातील विद्यार्थ्यांना याचा लाभ होईल.
सायन्स कॉलेजसाठी येथील विद्यार्थ्यांना गोकाक किंवा हुक्केरी येथे सुमारे 20 कि. मी. अंतर कापून शिक्षणासाठी जावे लागते. याचा विचार करून वरिष्ठ अधिकाऱयांसह लोकप्रतिनिधींनी 15 ऑगस्टपूर्वी पदवीपूर्व विज्ञान कॉलेजला मान्यता द्यावी, अशी मागणी यावेळी हुद्दार यांनी केली.