शिक्षणमंत्री एस. सुरेशकुमार यांची माहिती : दहावी विद्यार्थ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद
प्रतिनिधी /बेंगळूर
यंदा दहावी परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी धैर्याने परीक्षा द्यावी. सर्वच विद्यार्थी उत्तीर्ण होणार आहेत. त्यामुळे त्यांना पदवीपूर्वच्या पहिल्या वर्षात प्रवेश देण्यासाठी राज्य सरकारने सर्व तऱहेची व्यवस्था केली आहे, अशी माहिती प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणमंत्री एस. सुरेशकुमार यांनी दिली.
दहावी परीक्षेबाबत राज्यातील विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी शुक्रवारी डीएसईआरटीच्या मुख्यालयातून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधण्यात आला. याप्रसंगी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर प्रतिक्रिया देताना शिक्षणमंत्र्यांनी दहावीचे सर्वच विद्यार्थी उत्तीर्ण होणार असल्याने पदवीपूर्वच्या पहिल्या वर्षात प्रवेश मिळण्याविषयी गोंधळून जाऊ नये. सर्वच विद्यार्थ्यांना पदवीपूर्व महाविद्यालयीन प्रवेशासाठी व्यवस्था केली जाणार आहे, असे ते म्हणाले.
सर्वांनी दहावी परीक्षेवर लक्ष केंद्रीत करून धैर्याने परीक्षेला सामोरे जावे. राज्यातील सरकारी पदवीपूर्व महाविद्यालयांमध्ये जागा वाढविण्यात येतील. तसेच खासगी महाविद्यालयांकडून प्रवेशाची मर्यादा वाढवून देण्याची विनंती झाली तर त्याची दखल घेण्यात येईल. कोणताही विद्यार्थी अकरावीच्या प्रवेशापासून वंचित राहणार नाही, याची खबरदारी घेण्यात येणार आहे, असेही शिक्षणमंत्री म्हणाले.
ग्रामीण विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार
ग्रामीण भागातील अनेक मुले दूरदर्शन, मोबाईल, कॉम्प्युटर किंवा लॅपटॉप यांची उपलब्धता नसल्याने शिक्षणाच्या पर्यायी व्यवस्थेपासून वंचित राहात आहेत. काही ठिकाणी इंटरनेटची पुरेशी व्यवस्था नसल्याने शिक्षणात अडथळे येत आहेत, असा मुद्दा चिक्कमंगळूर आणि शिमोगा येथील विद्यार्थ्यांनी उपस्थित केला. त्यावर उत्तर देताना शिक्षणमंत्री म्हणाले, रोटरी क्लब, दानशूर व्यक्तींकडून मोबाईल व इतर वस्तू गटशिक्षणाधिकारी कार्यालयांमध्ये जमा केल्या जात आहे. त्याचप्रमाणे ग्रामीण भागात इंटरनेटचा वेग अधिक होण्यासाठी संबंधित कंपन्यांची बैठक बोलावण्याची विनंती मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे.