18 ऑगस्ट रोजी निर्णय अपेक्षित
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
अंतिम वर्षाच्या पदवी परीक्षांसंबंधीचा निर्णय आणखी काही दिवसांसाठी लांबणीवर पडला आहे. यासंबंधीच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात शुक्रवारी सुनावणी झाली असली तरी अंतिम निर्णय होऊ शकला नाही. आता पुढील सुनावणी 18 ऑगस्ट रोजी होणार आहे.
देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने महाराष्ट्रासह काही राज्यातील सरकारने परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर केंद्र सरकार आणि विद्यापीठ अनुदान आयोग यांनी अंतिम वर्षाच्या परीक्षा मार्गदर्शक तत्वांचा अवलंब करुन सप्टेंबर महिन्यात परीक्षा घेण्याच्या सूचना केल्या. मात्र विद्यार्थ्यांची सुरक्षा लक्षात घेत युजीसीच्या या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती.
सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणी दरम्यान, अंतिम वर्षाच्या परीक्षा घेणे क्रमप्राप्त असल्याचे मत शुक्रवारी युजीसीने व्यक्त केले. 6 जुलै रोजी जारी करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचना या तज्ञांच्या शिफारशींवर आधारित असून त्यानुसारच योग्य तो निर्णय घेण्यात आला आहे. मार्गदर्शक सूचनांनुसार अंतिम वर्षांच्या परीक्षा घेणे शक्मय नाही हा दावा चुकीचा आहे, असे युक्तिवादावेळी युजीसीने म्हटले आहे.