अनलॉक-4 बाबत मार्गसूची जारी : चित्रपटगृहे आजपासून उघडणार : नाईट कर्फ्यूची वेळ आता रात्री 10 ते पहाटे 5 वाजेपर्यंत
प्रतिनिधी /बेंगळूर
राज्यात सोमवार दि. 19 जुलैपासून चित्रपटगृहात आसन क्षमतेच्या 50 टक्के प्रेक्षकांना प्रवेश देण्यासह 26 जुलैपासून पदवी महाविद्यालये सुरू करण्यास अनुमती देण्यात आली आहे. त्याचबरोबर नाईट कर्फ्यूच्या वेळेत बदल करण्यात आला असून रात्री 10 ते पहाटे 5 पर्यंत नाईट कर्फ्यू जारी करण्याचा निर्णय मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांच्या नेतृत्त्वाखाली झालेल्या उच्चस्तरीय समितीच्या बैठकीत घेण्यात आला. दरम्यान, अनलॉक-4 बाबत मार्गसूची जारी करण्यात आली आहे.
या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना महसूलमंत्री आर. अशोक म्हणाले, राज्यात टप्प्याटप्प्याने लॉकडाऊन नियमांमध्ये शिथिलता आणली जात आहे. संकटात असलेल्या नागरिकांना काम मिळावे या उद्देशातून राज्य सरकार विविध निर्णय घेत आहे. सोमवारपासून चित्रपटगृहे, नाटय़गृह आणि सभागृह उघडण्यास मान्यता देण्यात आली आहे. तसेच रात्री 9 पासून असलेल्या कर्फ्यूचा अवधी रात्री 10 नंतर लागू करण्यात आला आहे, असे त्यांनी सांगितले.
याचबरोबर कोरोनाचे नियम पाळत मंदिरात विधीवत पूजा करण्यास परवानगी देण्यात आली आहे. पब पुन्हा सुरू करण्याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली आहे. राज्य सरकारचे मुख्य सचिव याबाबत मार्गसूची प्रसिद्ध करणार आहेत. जलतरण तलाव सुरू करण्याबाबत सविस्तर चर्चा केल्यानंतर लोकांच्या आरोग्याच्या हिताच्या दृष्टीने सध्यातरी परवानगी न देण्याचा निर्णय घेण्यात आला.
लॉकडाऊन नियमांत शिथिलता आणल्यानंतर राज्यात विविध उपक्रमांना परवानगी दिली आहे. या पार्श्वभूमीवर चित्रपटगृहे उघडण्यासही परवानगी द्यावी, अशी मागणी चित्रपटगृहांच्या मंडळाने केली होती. याची दखल घेत मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी आसन क्षमतेच्या 50 टक्के प्रेक्षकांना प्रवेश देत चित्रपटगृहे उघडण्यास मान्यता दिली आहे, असे त्यांनी सांगितले. 26 जुलैपासून राज्यभरात पदवी महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यानुसार कोरोना प्रतिबंधक लस घेतलेल्या विद्यार्थ्यांनाच महाविद्यालयात प्रवेश दिला जाणार आहे. तसेच लस न घेतलेले विद्यार्थी घरात बसूनच ऑनलाईन धडे घेऊ शकतात. महाविद्यालयात येणाऱया विद्यार्थ्यांना 1 तरी डोस घेणे बंधनकारक आहे. आठवडी बाजार, यात्रा, मंदिरांचे उत्सव, मोठय़ा बैठकांवरील निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत, असे मंत्री अशोक यांनी स्पष्ट केले.
बैठकीत उपमुख्यमंत्री डॉ. सी. एन. अश्वथ नारायण, महसूलमंत्री आर. अशोक, अरविंद लिंबावळी, सरकारचे मुख्य सचिव पी. रविकुमार, राज्य पोलीस महासंचालक प्रवीण सूद, शहर पोलीस आयुक्त कमलपंथ यांच्यासह ज्येष्ठ अधिकारी सहभागी झाले होते.
तिसरी लाट रोखण्यासाठी खबरदारी घेण्याची सूचना
राज्यात कोरोनाच्या तिसऱया लाटेला रोखण्यासाठी आवश्यक ती खबरदारी हाती घेण्याची सूचना मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी केली आहे. रुग्णालयात बेड, वैद्यकीय सुविधांसह उपाययोजना राबविण्याबाबतही सूचना केली आहे. तसेच बालकांच्या रुग्णालयात मूलभूत पायाभूत सुविधा वाढविणे, ऑक्सिजन साठवणुकीसह सर्व आवश्यक काळजी घेण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच राज्यात तिसऱया टप्प्यातील कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सर्व तयारी केली जात आहे, असे त्यांनी सांगितले.