पहिल्या किंवा दुसऱया आठवडय़ात लसीकरण- उपमुख्यमंत्री डॉ. अश्वथ नारायण यांची माहिती
प्रतिनिधी/ बेंगळूर
राज्यातील शाळा-महाविद्यालये टप्प्याटप्प्याने सुरू करण्याबाबत राज्य सरकार विचाराधीन आहे. कोरोना संसर्ग नियंत्रणाबरोबरंच अध्यापकांना लस दिली जात आहे. आता पदवी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनाही लस देण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री आणि कोविड तांत्रिक सल्लागार समितीचे अध्यक्ष डॉ. अश्वथ नारायण यांनी दिली.
बेंगळूरमध्ये बुधवारी विद्यार्थ्यांना टॅब्लेट पीसी वितरण कार्यक्रमानंतर पत्रकारांशी ते बोलत होते. कोरोनाच्या संभाव्य तिसऱया लाटेबाबत खबरदारी उपाययोजनांसह अनेक मुद्दय़ांविषयी डॉ. देवी शेट्टी यांच्या नेतृत्वाखालील समितीने अहवाल दिला आहे. सर्वात आधी पदवी महाविद्यालये सुरू करण्याची शिफारस करण्यात आली आहे. जुलैच्या पहिला आठवडय़ात किंवा दुसऱया आठवडय़ात पदवी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना महाविद्यालयातच कोरोना प्रतिबंधक लस देण्याचा विचार सुरू आहे, असे ते म्हणाले.
अलीकडेच 18 वर्षांवरील व्यक्तींना लस देण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यातही विद्यार्थ्यांच्या गटाचे लसीकरण करण्यासाठी त्यांचा प्राधान्य गटात समाविष्ट करण्यात येईल, असे एका प्रश्नावर उत्तर देताना त्यांनी सांगितले.
कोरोनाच्या डेल्टा प्लस विषाणूचा कर्नाटकातही रुग्ण आढळल्याची माहिती मिळाली आहे. लस घेतल्यानंतर कोणत्याही प्रकारच्या विषाणूचा संसर्ग झाला तरी अधिक प्रभाव पडणार नाही. त्यामुळे सर्वांनी लस घ्यावी. कोरोनापासून रक्षणासाठी लस हा एकमात्र प्रभावी उपाय आहे, असेही ते म्हणाले.
विद्यार्थ्यांचे आरोग्यहित महत्त्वाचे…
18 वर्षांवरील विद्यार्थ्यांना कोविड प्रतिबंधक लस दिल्यानंतरच महाविद्यालये सुरू करण्याबाबत प्राथमिक-माध्यमिक आणि उच्च शिक्षणमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेतला जाणार आहे. महाविद्यालये सुरू करण्याबाबत कोविड तांत्रिक सल्लागार समितीने अहवाल दिला आहे. या समितीशी पुन्हा चर्चा केली जाईल. विद्यार्थ्यांच्या आरोग्यहिताला सरकारचे प्रथम प्राधान्य असेल. कोणत्या पद्धतीने आणि किती दिवसांत विद्यार्थ्यांचे लसीकरण करावे, याबाबत चर्चेनंतर निर्णय घेण्यात येणार आहे, अशी माहिती आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री डॉ. के. सुधाकर यांनी दिली.