प्रतिनिधी / कोल्हापूर
शासन निर्णयानुसार इयत्ता सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना गणित विज्ञान विषय शिकविण्यासाठी बीएससी अथवा बारावी विज्ञान शिक्षक पात्र असताना कोल्हापूर जिल्हा परिषदकडून डावलले जात असल्याने विज्ञान विषय कृती समितीच्या वतीने 8 ऑक्टोबर रोजी जिल्हा परिषद समोर धरणे आंदोलन करणार असल्याची माहिती समितीच्यावतीने प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
पत्रकात म्हटले आहे, 12 वी विज्ञान असणाऱया शिक्षकांची नियुक्ती करणे बंधनकारक आहे. सद्यस्थितीला 4 ऑक्टोबर पासून महाराष्ट्रात सर्व ठिकाणी इयत्ता पाचवी पासून पुढील वर्ग सुरू झाले आहेत. पण या वर्गांवर कोल्हापूर जिह्यामध्ये गणित विज्ञान विषय शिकवण्यासाठी संबंधित संवर्गातील शिक्षकांची सुमारे 80 टक्के पदे रिक्त आहेत. या प्रश्नांसंदर्भात पदोन्नती घेण्यासाठी पात्र शिक्षकांची संख्या सुमारे 1100 आहे. पदोन्नती घेण्यास इच्छुक असणाऱयांप्रमाणेच काही विषय शिक्षक रिव्हर्शन घेण्यासही आतुर आहेत.
त्याचबरोबर काही विषय शिक्षक ज्यांचे मॅपिंग विज्ञान मधून होऊ शकते, पण आत्ता त्यांचे मॅपिंग भाषा, समाजशास्त्र मधून आहे अशा शिक्षकांचीही पदोन्नती प्रक्रिया राबवणे अत्यावश्यक आहे. पदोन्नती झाल्यास विज्ञान विषय शिक्षकांच्या सर्व अडचणी दूर होऊन शिक्षण विभागातही विषय निहाय शिक्षकांचे मॅपिंग करण्यास सोयीस्कर होणार आहे. हे सर्व असतानाही नेमकी अडचण कशात आहे ? हे कळायला मार्ग नाही. हा प्रश्न मार्गी लावण्याच्या संदर्भाने गेले दीड वर्ष पदोन्नतीसाठी इच्छुकांच्या शिक्षकांबरोबरच रिव्हर्शनसाठी इच्छुक शिक्षकांनीही पाठपुरावा केला आहे. तरीही हा प्रश्न अजून निकाली निघाला नाही. त्यामुळे या सर्वांनी एकत्रित येऊन शुक्रवारी जिल्हा परिषदेसमोर भव्य धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.