पंतप्रधान मोदींची वर्षातील पहिली ‘मन की बात’ ः भारतीय ‘लोकशाही’विषयी परखड भाष्य
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी मन की बात कार्यक्रमात देशवासियांना संबोधित केले. त्यांनी पद्म पुरस्कार विजेत्यांच्या जीवनकथा सांगितल्या आणि लोकांना त्यांच्या प्रेरणादायी जीवनकथा अभ्यासण्याचे आवाहन केले. यासोबतच लोकशाही आपल्या रक्तात आणि संस्कृतीत असल्यामुळे शतकानुशतके आपल्या कार्याचाही तो अविभाज्य भाग बनला आहे. भारत हा जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला देश आहे. आपला देश लोकशाहीची जननी आहे. याचा आम्हा भारतीयांना अभिमान असल्याचे पंतप्रधान म्हणाले.
पंतप्रधान मोदी यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाचा रविवारी 97 वा भाग होता. तसेच 2023 या चालू वर्षातील हा पहिला भाग होता. या कार्यक्रमाद्वारे पंतप्रधान अनेकदा लोकांना प्रेरणादायी गोष्टी सांगत असतात. यावषी आदिवासी समुदाय आणि समाजाशी संबंधित लोकांना पद्म पुरस्कार जाहीर झाले आहेत, त्यांचेही पंतप्रधानांनी अभिनंदन केले. आदिवासींचे जीवन शहरी जीवनापेक्षा वेगळे आहे. त्यांना खूप आव्हानांचा सामना करावा लागतो. एवढय़ा सगळय़ात आदिवासी समाज आपल्या परंपरा जपण्यासाठी नेहमीच तत्पर असतो, असेही पंतप्रधान म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील अलिबागमधील केनाड गावच्या शर्मिला ओसवाल यांचेही मन की बात मध्ये कौतुक केले. ओसवाल या गेल्या 20 वर्षांपासून तृणधान्याचे उत्पादन घेत आहेत. तसेच शेतकऱयांना त्या मार्गदर्शनही देत आहेत. तृणधान्याचे उत्पादन वाढवण्याचे प्रयत्न त्या करत असून त्यांचे हे कार्य कृषीप्रधान देशासाठी निश्चितच अभिमानास्पद असल्याचे पंतप्रधान म्हणाले.
भारताच्या प्रस्तावानंतर संयुक्त राष्ट्र संघाने आंतरराष्ट्रीय योग दिन आणि आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष साजरे करण्याचा निर्णय घेतला आहे. योग आणि बाजरी आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. हे दोन्ही घटक आपल्या आरोग्यात महत्त्वाची भूमिका बजावतात असेही पंतप्रधान म्हणाले. यामध्ये लोकांचा सहभाग वाढत असल्यामुळे देश नवीन क्रांतीच्या मार्गावर असल्याचे पंतप्रधान म्हणाले.
गोव्यातील पर्पल फेस्ट कार्यक्रमाचा उल्लेख
गोव्यात अलीकडेच पर्पल फेस्टचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाचाही मन की बातमध्ये उल्लेख करताना दिव्यांगांच्या कल्याणासाठी हा एक अनोखा प्रयत्न असल्याचे त्यांनी नमूद केले. यामध्ये 50 हजारांहून अधिक बंधू-भगिनी सहभागी झाले होते याचा आनंद झाल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले.
प्रजासत्ताक दिन परेडचे कौतुक
प्रजासत्ताक दिनाच्या सोहळय़ातील अनेक पैलूंची खूप प्रशंसा केली जात आहे. 26 जानेवारीच्या परेडदरम्यान कामगारांना कर्तव्याचा मार्ग तयार करताना पाहून खूप आनंद झाला. या परेडमध्ये पहिल्यांदाच सहभागी झालेल्या महिला उंट स्वार आणि सीआरपीएफच्या महिला दलाचेही खूप कौतुक होत असल्याचे पंतप्रधान म्हणाले. तसेच ‘आत्मनिर्भर’ योजनेला देण्यात आलेल्या प्राधान्याचीही त्यांनी प्रशंसा केली.