जि.प.प्रशासनाने 3 महिन्यांपूर्वी केल्या 50 आंतरजिल्हा बदल्या
प्रतिनिधी / रत्नागिरी
जिल्हय़ात अगोदरच ग्रामसेवकांवर एकापेक्षा अधिक ग्रामपंचायतींचे दफ्तर सांभाळण्याची कसरत करावी लागत आहे. अशावेळी जिल्हय़ातील 50 ग्रामसेवकांच्या तीन महिन्यांपूर्वी तात्काळ झालेल्या आंतरजिल्हा बदल्यांमुळे जिल्हय़ात ग्रामसेवकांवरील कामकाजाचा बोजा आणखीनच अवजड झालेला आहे. पदाधिकारी व सदस्य अंधारात राहिल्याने ही चर्चा जि.प.वर्तूळात रंगली.
जिल्हय़ात 848 ग्रामपंचायती आहेत. त्यातील 30 टक्के ग्रामसेवकांची पदे रिक्त असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे ग्रामपंचायतींचे दप्तर सांभाळताना उपलब्ध असलेल्या ग्रामसेवकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. अनेक ग्रामसेवकांकडे एकाहून अधिक ग्रामपंचायतींचे कार्यभार सांभाळावे लागत आहेत. त्यामुळे ग्रामसेवकांची मोठी दमछाक होताना दिसत आहे. त्याचा परिणाम ग्रामपंचायतींच्या कारभारावर होताना दिसत आहे.
अशा अडचणीत तीन महिन्यांपूर्वी जिल्हा प्रशासनस्तरावरून 50 ग्रामसेवकांच्या आंतरजिल्हा बदल्यांची प्रक्रिया करण्यात आली. त्यावेळी ही प्रक्रिया करताना ‘या कानाची खबर त्या कानाला लागणार नाही’ अशा पध्दतीने करून सोपस्कार उरकून घेतले. त्यामुळे पदाधिकारी व सदस्यही अनभिज्ञ राहिले. तीन महिन्यांनंतर याची कुणकूण सदस्यांना लागली. त्यांनी याचा जाब त्यानंतर झालेल्या स्थायी समिती सभेत विचारला होता. कोणाला विश्वासात न घेता बदल्या झाल्याच कशा, असा सवाल करत संबधित अधिकाऱयांवर कारवाई करण्याची मागणी सदस्यांनी उचलून धरली.